मुरुम : समाजात  सामाजिक,शैक्षणिक व आर्थिक प्रगती साधण्यासाठी इथला गरीब,वंचित माणूस शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी जोपर्यंत धर्मांधता,जातीय व्यवस्था,कर्मकांड व मानसिकता या बाबी नष्ट होणार नाहीत तोपर्यंत सामान्यांचे मुलभूत प्रश्नही सुटणार नाहीत. संविधान तयार करताना उपेक्षितांना मोफत व सक्तीचे शिक्षण दिले पाहिजेत तरच त्यांचा सर्वांगीण विकास होईल हा हेतू होता. त्यामुळेच डॉ.आंबेडकरांनी औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची उभारणी करून शिक्षणाचा प्रचार व प्रसार केला. शैक्षणिक चळवळीतून महामानवाचे विचारच माणसाच्या जीवनाला दिशा देतात असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डॉ.महेश मोटे यांनी केले.

 महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती, भूगोल विभाग व श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने २७ वा विद्यापीठ नामाविस्तार दिन, जागतिक भूगोल दिन व मकर संक्रांत या त्रिवेणी दिनाचे औचित्य साधून व्याख्यानात  ' डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक धोरण आणि बदलती आव्हाने ' या विषयावर गुरूवारी (ता.१४) रोजी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. 


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.अशोक सपाटे होते. यावेळी डॉ.अरविंद बिराजदार, डॉ.संजय गुरव, डॉ.सुधीर पंचगल्ले, डॉ.शीला स्वामी, डॉ.सोमनाथ बिरादार आदिंची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस डॉ.महेश मोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.   

 पुढे बोलताना डॉ.मोटे म्हणाले की, विद्यापीठ नामाविस्तार दिनाचा पूर्वतिहास सांगताना सर्वांनी जातीय दृष्टीकोन बदलून शैक्षणिक मतप्रवाह बदलणे गरजेचे आहे. शिक्षणाच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन होईल. यासाठी राजकीय लोकशाहीचे रुपांतर सामाजिक व आर्थिक दृष्टीकोनातून करणे आवश्यक आहे. नामंतराचा इतिहास सर्वांनी वाचला पाहिजे व तो समजूनही घेतला पाहिजे. तरुणांनी बाबासाहेबांचे विचार आत्मसात करुन स्वतःच्या व्यक्तीमत्वाचा विकास करुन घ्यावा असे ते शेवटी म्हणाले.          

अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ.अशोक सपाटे म्हणाले की, तरुणांनी सामर्थ्य संपन्न बनण्याकरिता चांगले व गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन स्वतःचा विकास साधावा. सध्या विद्यार्थ्यांसमोर विविध आव्हाने उभी असताना आपण स्वतःला काळानुरूप बदलले पाहिजे. विचार बदला परिवर्तन नक्की होईल. 

 प्रा.डॉ.नागनाथ बनसोडे, डॉ.विलास खडके, डॉ. अविनाश मुळे, डॉ.नरसिंग कदम, प्रा.सुजित मटकरी, डॉ.सुशिल मठपती, सुरेखा पाटील, राजानंद स्वामी, लालअहमद जेवळे, मशाक कागदी, श्रावण कोकणे, इसाली चाऊस आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संध्या डांगे तर पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ.पुरुषोत्तम बारवकर यांनी करुन दिला. सूत्रसंचालन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राचे संयोजक प्रा.डॉ.सुभाष हुलपल्ले तर आभार प्रा.डॉ.अप्पासाहेब सुर्यवंशी यांनी मानले. यावेळी विविध शाखेतील बहुसंख्ये विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

 
Top