चिवरी, दि . २५, राजगुरु साखरे:
आवक वाढल्याने भाजीपाल्याचे भाव घसरले असल्याने शेतकर्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावी लागत आहे, तर काढणी व वाहतूक खर्चही निघत नसल्याने मेहनत पाण्यात गेली अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
परंतु कांदा, वांगी ,हिरवी मिरची ,भेंडी ला बाजारात समाधानकारक भाव मिळत असून टोमॅटो, मेथी ,कोथिंबीर, काकडी मातीमोल भावाने विक्री करावी लागते आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांमधून कही खुशी कही गम असे चित्र दिसत आहे . गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने विहीर, कूपनलिकेला मुबलक पाणी आहे, परतीच्या जोरदार पावसामुळे भाजीपाला सडुन गेला होता त्यामुळे महिन्यापूर्वी बाजारात भाजीपाल्याला चांगला भाव मिळाला. यातून शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला हे पाहून आणि शेतीला पाणी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवड केली, जवळपास सर्वच शेतकऱ्याकडे भाजीपाला असल्याने बाजारात आवक वाढली. मागणी कमी आवक जास्त झाल्याने आडत ,आठवडी बाजारात ही दर घसरले.
रविवार दि. 24 रोजी नळदुर्ग येथील आठवडी बाजारात टोमॅटो ५ रुपये किलो, बटाटा दहा रुपये किलो, काकडी 20 रुपये किलो, मेथी दहा रुपयात दोन जोडी, कोथिंबीर पाच रुपये जुडी, असा मातीमोल दर मिळत असल्याचे दिसून आले, यातून काढणी व वाहतूक खर्च निघाला नाही. परंतु या परिस्थितीत ही कांदा 40 रुपये किलो वांगी 30 ते 40 रुपये , भेंडी 30 रुपये किलो असा दर असून याचे उत्पादन घेणारे शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.
सर्वाधिक नुकसान टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची झाले असून शंभरच्या पुढे सरकलेला दर एकदम दोन ते तीन रुपये वर आला, असुन यातून तोडणी करणे शेतकऱ्यांना परवडणारे नसल्याने अनेकांनी टोमॅटो विक्री करण्यास बंद केले आहे, त्यामुळे शेतात लाल चिखल दिसत आहे.