उस्मानाबाद ,दि.१९ : उस्मानाबाद तालुक्यातील दारफळ येथे प्रथमच जनतेने युवाशक्तीला कौल दिला आहे.दारफळ ग्रामपंचायत १९६२ मध्ये स्थापन झाल्यापासून एकास एक याप्रमाणे दोनच पॅनलच्या माध्यमातून निवडणुका व्हायच्या. परंतु यावर्षी युवासेनेचे जिल्हा समन्वयक अॕड. संजय भोरे यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही ग्रामविकास पॅनलने नऊ पैकी नऊ जागा लढवत यावेळी चुरशीची लढत दिली.
यामध्ये सर्वसाधारण पुरुष या जागेवर अॕड. संजय बळीराम भोरे यांच्यासह अनुसूचित जाती पुरुष या जागेवर मारुती विलास ओव्हळ या दोघांचा विजय झाला आहे. नव्याने उभारलेल्या लोकशाही ग्राम विकास पॅनल मुळे दारफळ येथील सत्तेची समीकरणे फारच बदलली असून बहुमताचा जादुई आकडा पूर्ण करण्यासाठी लोकशाही ग्राम विकास पॅनल हाच एकमेव पर्याय ठरणार आहे. कारण संत कोकणे बुवा ग्राम विकास पॅनल ला तीन जागा तर जनसेवा ग्राम विकास पॅनलला चार जागांवर समाधान मानावे लागले आहे.
तर या निवडणुकीत दिग्गज घराण्यांना पराभवास सामोरे जावे लागले आहे. यामध्ये जनसेवा ग्रामविकास पॅनल चे पॅनल प्रमुख बलभिम जाधव यांच्या पत्नी शीतल बलभीम जाधव यांना तसेच संत कोकणे बुवा ग्राम विकास पॅनल चे संभाजी इंगळे व अमोल जाधव यांना देखील पराभवास सामोरे जावे लागले आहे. संत कोकणे बुवा ग्राम विकास पॅनल चे पॅनल प्रमुख तथा दारफळचे माजी सरपंच प्रमोद पाटिल यांचा देखील करिश्मा फारसा चालला नाही.एकंदरीत पाहता दारफळ येथील जनतेने मात्र अनोखा कौल दिला असून दारफळ येथील जनता जनार्धनाची धाराशिव तालुक्यात जोरदार चर्चा आहे.