तुळजापूर, दि. २४ :
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरणे अडचणीचे झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देऊनही शिक्षण संस्था शुल्कामध्ये एक रुपयाही कमी करण्यास तयार नाही. ज्या सुविधा गेल्या वर्षभर वापरल्या नाहीत, त्या सुविधांचे शुल्क मागील वर्षी शिक्षण संस्थांनी वसूल केले आहे. ही वसुली थांबवावी अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी आघाडीने घेतली आहे.
संकटाच्या काळामध्ये शिक्षण संस्था आपला नफा सोडायला तयार नाहीत. शिक्षण संस्थांच्या या आडमुठेपणाच्या धोरणाच्या विरोधात आता राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मैदानात उतरली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांच्या आदेशानुसार राज्यभर एक पाऊल विद्यार्थ्यांसाठी ही मोहीम सुरू केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळूंके यांनी दिली.
या मोहिमेअंतर्गत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, मराठवाडा विभागाचे अध्यक्ष प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील मुद्यांवर आक्रमक भूमिका घेणार असल्याचे असे जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंके, तालुकाध्यक्ष रोहित चव्हाण, शहराध्यक्ष आदित्य शेटे यांनी सांगितले.
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशाचा मान ठेवत सर्व शिक्षण संस्थांनी आपल्या शिक्षण शुल्कात सरसकट कपात करावी, त्याचबरोबर विद्यार्थी ज्या सुविधा वापरत नाहीत त्याचे शुल्क आकारू नये असे आदेश दिलेले आहेत. शिक्षण शुल्क समितीने लवकरात लवकर राज्यातील सर्व शिक्षण संस्थांच्या शुल्क निच्छितीची पुन्हा प्रक्रिया करून नवीन शुल्क निच्छित करावे. तोपर्यंत कोणत्याही पालकांकडून शिक्षण संस्थाना शुल्क आकारण्याचा हक्क नाही,असा आदेश काढावा. केंद्र सरकारने आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने सर्व बँकांना शुन्य टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्ज योजना लागू करण्याचे निर्देश द्यावेत.
नर्सरी ते १० वी चे शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्थानी शैक्षणिक साहित्य (पुस्तके, वह्या इ.) शाळेतूनच घ्यावे लागतील ही सक्ती करु नये. तसेच बोर्डाने (CBSE,ICSE,STATE) जी पुस्तके निर्देशित केली आहेत तीच पुस्तके शिकवताना वापरावीत.
दुसऱ्या कोणत्याही प्रकाशनाची महाग पुस्तके पालकांना घेण्यास भाग पाडू नये. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल व त्या शिक्षण संस्थेची तक्रार संबधित बोर्डाकडे करण्यात येईल.
ज्या विद्यार्थ्यांचे मागील वर्षाचे शुल्क राहिले असेल त्या विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत परीक्षे पासून अथवा शिक्षणापासून वंचित ठेवू नये. तसेच त्याला शाळा- महाविद्यालय सोडण्यास भाग पाडू नये.
या शैक्षणिक प्रमुख मुद्द्यांना घेऊन अभियानांतर्गत सर्व शिक्षण संस्थांना निवेदन देण्यात येणार असून पालक व विद्यार्थ्यांसाठी त्या त्या भागातील हेल्पलाईन क्रमांक देण्यात येणार आहे. शिक्षण संस्थांनी अडवणूक केल्यास त्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या मोहिमेत समाजातील विद्यार्थी , पालक,नागरिक, सरकारी संस्था, सरकारी यंत्रणा आदीनी सहभागी होत गरज पडेल तिथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दुर्गेश श्रीराम साळुंके तालुकाध्यक्ष रोहित चव्हाण, शहराध्यक्ष आदित्य शेटे यांनी केले आहे