लोहारा,दि.०१ : इकबाल मुल्ला
रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असुन अल्पावधीत कोरोना लसीकरणास सुरुवात होणार असल्याने १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार आहे. लस घेतल्यानंतर दोन महिने तरी रक्तदान करता येणार नाही. सध्या मोठ्या प्रमाणात रक्ताची टंचाई भासत असल्याने महाविकास आघाडी सरकार व प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन महाराष्ट्र दिन तथा कामगार दिनाचे औचित्य साधून प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापुराव पाटील, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील यांच्या पुढाकाराने युवक काँग्रेस व काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवार रोजी मुरुम येथील प्रतिभा निकेतन विद्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.
या शिबीराचे उद्घाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगराव जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप भालेराव, कंटेकूरचे सरपंच गोविंद पाटील, महालिंग बाबशेट्टी, संजय मिणीयार, माजी नगराध्यक्ष बबनराव बनसोडे, माजी उपनराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे, उल्हास घुरघुरे, काशीनाथ मिरगाळे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
या शिबीरासाठी राम डोंगरे, किरण गायकवाड, देवराज संगुळगे, राजु मुल्ला, युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष राहूल वाघ, गौस शेख, प्रशांत मुरुमकर, प्रणित गायकवाड, नेताजी गायकवाड आदींनी पुढाकार घेतला.
या शिबिरात सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आणि शासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देवून ४७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदात्यांचा एक वर्षाचा पाच लाख रुपयाचा अपघाती विमा यावेळी उतरविण्यात आला.
उस्मानाबाद शासकीय रक्तपेढीचे डॉ.अश्विनी गोरे, तंत्रज्ञ अक्षय जगताप, वैद्यकीय सामाजिक अधिक्षक गणेश साळूंके, परिचर महादेव कावळे, परिचारिका हिरवे आदिंनी शिबीर यशस्वी केले.