लोहारा दि . ३० :
कारखान्याला ऊस पाठवून आठ महिने झाले तरी अजून ही लोहारा येथील लोकमंगल साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत. अगोदरच कोरोनाने मेटाकुटीस आलेला शेतकरी पेरणीसाठी हवालदिल झाला असून हक्काचे पैसे ही मिळत नसल्याने उध्वस्त झाला आहे.
आता याविरूध्द राष्ट्रवादी कॉग्रेस तीव्र आंदोलन करणार असल्याचे निवेदन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जगादिश पाटील यांनी तहसिलदारांना दिले आहे.
घराघरात कोरोनाचे पेशंट निघत असताना शेतकऱ्यांना खासगी सावकारांचे उंबरठे झिजवावे लागले . परंतु पोटाला चिमटा मारून कष्टाने पिकवलेल्या ऊसाचे पैसे मिळालेच नाहीत.आता पेरणीसाठी उदारीने बि - बियाने ,खते किटकनाशके सारख्या इतर बाबीसाठी बळीराजा हवालदिल झाला आहे.
उस्मानाबाद जिल्हा शेतकरी आत्महत्यांसाठी देशात आघाडीवर आहे.एका माजी सहकारमंत्र्यांच्या कारखान्याने शेतकऱ्यांची एवढी पिळवणूक करावी ही बाब योग्य नाही.शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये.
निवेदन देताना जिल्हा कोषाध्यक्ष जगदिश पाटील,राष्ट्रवादी शहर अध्यक्ष आयुब शेख,तौफिक कमाल,ताहेर पठाण,सरफराज इनामदार ,अमित कांबळे आदी उपस्थित होते.