तुळजापूर, दि. १६ :
तुळजापूर येथे असणाऱ्या ई-सेवा केंद्राकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक करण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढल्या असुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अविनाश पवार यांनी तुळजापूर तहसीलदार यांच्याकडे विद्यार्थ्यांची व नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याची तक्रार दाखल केली आहे
तुळजापूर तहसील कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालय परिसरामध्ये चालवण्यात येणाऱ्या ई-सेवा केंद्रामधुन मोठ्या प्रमाणात नागरिकांची आर्थिक पिळवणूक करण्यात येत आहे. प्रमाणपत्रासाठी ३३ रुपये ५० पैसे शासनाने दर निश्चित केला असून त्यासाठी दोनशे रुपये , तीनशे रुपये एवढ्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट करण्यात येत असून याविषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अविनाश पवार यांनी तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे. ही केंद्र ज्या ठिकाणी मान्यताप्राप्त जागा आहे, यामध्ये इतर केंद्र चालवून ही लुबाडणूक करण्यात येत आहे. विद्यार्थी विविध प्रमाणपत्रासाठी सध्या या केंद्रामध्ये जात असून त्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय वर्षभर शहरी आणि ग्रामीण दोन्ही ठिकाणच्या नागरिकांना वेगवेगळ्या प्रमाणपत्रासाठी ई-सेवाकेंद्रामध्ये जावे लागते. या सर्व प्रमाणपत्रांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करण्यात येत असून यावर वेळीच प्रतिबंध न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्टाईलने प्रशासनाच्या विरुद्ध आंदोलन केले जाईल असा इशारा मनसेचे अविनाश पवार यांनी दिला आहे.