उस्मानाबाद , दि . १८ 

 ईटकुर (ता.कळंब जि.उस्मानाबाद) गावाने राबवलेली हरितक्रांती मोहीम आता मांडवे करांनी राबविण्याचा विडा उचलला आहे. 


 वाशी तालुक्यातील मांडवा येथे घर तिथे वृक्ष लागवड आणि संगोपन करण्याचा मनोदय हरितक्रांती समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मांडवा या ठिकाणी 16 जुलैला राजकारण विरहित,गावच्या भल्यासाठी हरित क्रांति मोहीम राबवण्याचा एक मुखी निर्णय बैठक आणि समिती स्थापन करून घेण्यात आला.

     
 माझे गाव स्वच्छ, सुंदर गाव ,  ही संकल्पना केवळ मर्यादित काळापुरती न ठेवता गावचा कायापालट करण्यासाठी ईटकुर येथील गावकऱ्यांनी राबवलेले उपक्रम मांडवा गावकऱ्यांनी प्रत्यक्षात समिती स्थापन करून राबवायला सुरुवात केली आहे. 

गावचे माजी सरपंच सुनील आप्पा पाटील, पांडुरंग काका देशमुख, सुतार सर आणि सरपंच भगतसिंह गहेरवार यांनी गावातील डॉ. शशिकांत सुनील पाटील यांच्या 22 व्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा जाहीर कार्यक्रम घेतला. कार्यक्रमानंतर उपस्थित गावकर्‍यांच्या मदतीने हरितक्रांती मांडवा समितीची निवड करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी गोरख किसन शिंदे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी राजेभाऊ पांडुरंग देशमुख, कार्याध्यक्ष समीर युनूस पठाण, सचिव लक्ष्मीकांत बाबुराव तावरे, कोषाध्यक्ष धनंजय भिमराव रणदिवे, सोशल मीडिया प्रमुख गणेश बाळासाहेब पाटील यांची निवड केली.

       
गावातील प्रत्येक घरासमोर वृक्षलागवड करून त्याचे संगोपन करण्याचा निर्णय समितीने घेतलेला आहे. गावच्या बँकेमध्ये हरितक्रांती समितीच्या नावे खाते उघडले जाणार आहे. त्यामध्ये गावातील आणि नोकरी-व्यवसायानिमित्त गावाबाहेर असणाऱ्या ग्रामस्था मार्फत वेळोवेळी निधी जमा करून त्यामाध्यमातून वृक्ष संगोपन करण्यासाठी लोखंडी संरक्षक जाळी बसवली जाणार आहे. तसेच झाडांना लागणारे पाणी देण्यासाठी टँकर घेतला जाणार आहे. यासाठी गावातील ट्रॅक्टर चालकांची मदत घेतली जाणार आहे. 

      

खऱ्या अर्थाने गाव हरितक्रांती करण्यासाठी राजकारण विरहित निर्मित समिती अंग झाडून कामाला लागलेली आहे.अशी माहिती गावचे उपसरपंच भगतसिंह गहेरवार यांनी दिली.
 
Top