तुळजापूर दि . ५ : 

मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण, एम पी एस सी उत्तीर्ण विद्यार्थ्याची आत्महत्या, शेतकऱ्यांचे प्रश्न या विषयांमध्ये अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचा आपण निषेध करीत असल्याची प्रतिक्रिया तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिह पाटील यांनी दिली आहे.


महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणा देत निषेध करण्याबाबत आमदार पाटील यांची प्रतिक्रिया विचारली असता राज्य सरकारने आज केलेली कृती मराठा आरक्षण आणि ओबीसी राजकिय आरक्षण विषयातील अपयश असल्याचे सांगून महत्त्वाचे प्रश्न या गोंधळात मागे पडले आहेत, सरकारने ही कृती जाणून बुजून केली आहे असे सांगितले.

सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने थोडी तरी संवेदनशीलता दाखविणे गरजेचे होते. मात्र भाजपचे संख्याबळ कमी करण्याच्या उद्देशाने सरकारने ही कृती केली आहे. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ असून आगामी काळात याविषयी भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून योग्य तो संदेश लोकांना देणार आहे. असेही आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

आपण स्वतः उस्मानाबाद जिल्ह्याच्या विविध प्रश्नासाठी या अधिवेशनात प्रश्न सोडवून घेण्यासाठी उत्सुक होतो. तशी पूर्वतयारी आपण केलेली होती. मात्र सरकारने केलेल्या कृतीमुळे जनतेच्या विविध प्रश्नांची सोडवणूक होऊ शकली नाही, आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता सरकारने अधिक काळजीने अधिवेशन हाताळणे गरजेचे होते परंतु सरकारचा हेतू  नसल्यामुळे आजचा हा प्रकार सरकारमधील नेत्यांनी घडवून आणला आहे, असा घणाघात यानिमित्ताने आमदार पाटील यांनी सरकारवर केला.
 
Top