काटी , दि .२१ 

तुळजापूर तालुक्यातील काटी येथे शनिवार दि. 21 रोजी सकाळी दहा ते चार या कालावधीत रेशनकार्ड  समस्येवर येथील ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आलेल्या शिबिरात नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. 


प्रारंभी नायब तहसीलदार संदीप जाधव, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, सरपंच आदेश कोळी, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सयाजीराव प्र. देशमुख, प्रदिप साळुंके, अनिल गुंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव आदी मान्यवरांच्या हस्ते आई तुळजाभवानी प्रतिमेचे पूजन करून शिबिरास प्रारंभ करण्यात आला.

 दिशा समितीचे अध्यक्ष खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सुचनेनुसार महसूलच्या पुरवठा विभागाच्या वतीने तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षक तथा नायब तहसीलदार संदीप जाधव, मंडळ अधिकारी बाळासाहेब जगताप यांच्या उपस्थितीत सावरगाव महसूल मंडळाअंतर्गत येणाऱ्या गावांतील नागरिकांसाठी येथील काटी ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आलेल्या रेशनकार्ड संदर्भातील शिबिरात नागरिकांच्या समस्येचा निपटारा करण्यात आला. 
या शिबिरात अनेकदा रेशनकार्ड संदर्भात रेशनकार्ड अपडेट करण्याबरोबरच विविध समस्यांमुळे नागरिकांना प्रशासकीय कार्यालयांमध्ये चकरा माराव्या लागतात. कागदपत्रांची पूर्तता नसल्याने व अपुरी माहितीमुळे अनेक कुटुंबाचे रेशनकार्ड दुरुस्त होत नाही. तालुका स्तरावर या याबाबत अर्ज प्रलंबित राहत असल्याने दिशा समितीच्या बैठकीत समितीचे अध्यक्ष खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. 
त्याअनुषंगाने जिल्हाभर रेशनकार्ड संदर्भात शिबिराचे आयोजन करण्यात येत असून काटी ग्रामपंचायतच्या मागणीनुसार सावरगाव मंडळातील सज्जा अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांच्या रेशनकार्ड संदर्भातील अडचणी जाणून घेऊन त्या रेशनकार्ड शिबिरामार्फत सोडविण्यात आल्या. या शिबिरात नायब तहसीलदार संदीप जाधव यांनी रेशनकार्ड संदर्भात माहिती देऊन प्रत्येक ग्रामस्थाला रेशनकार्ड संदर्भातील आपली समस्या मांडण्याची संधी यावेळी देण्यात आली.तसेच उर्वरित समस्येबाबत सहकार्याचे आश्वासन देऊन नागरिकांनी स्वतः तहसिल कार्यालयाकडे पाठपुरावा करावा असे आवाहन करण्यात आले. या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या समस्या मांडल्या. या शिबिराचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला. या शिबिरात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी नाव समाविष्ट करणे, नाव कमी करणे, महात्मा फुले जिवनदायी प्रमाणपत्र देणे, दुय्यम शिधापत्रिका देणे, मदत कक्ष असे स्वतंत्र टेबल मांडण्यात आले होते. दिवसभर चाललेल्या या शिबिरात  फाटलेले रेशनकार्ड नवीन करणे, पत्ता बदल करणे, हरवलेले रेशनकार्ड नवीन करणे, रेशनकार्ड विभक्त करणे, रेशनकार्ड मध्ये नाव वाढविणे, कमी करणे, महात्मा फुले जिवनदायी योजना प्रमाणपत्र देणे, दुय्यम शिधापत्रिका मागणीच्या संदर्भात असे एकूण 276 शिधापत्रिकाधारकांनी पुरवठा विभागाकडे अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने नाव समाविष्ट करण्यासाठी 74, अर्ज दाखल झाले.नाव कमी करण्यासाठी  26 अर्ज, दुय्यम शिधापत्रिका मागणी अर्ज 152 , महात्मा फुले जिवनदायी योजनेसाठी 24 अर्ज दाखल झाले आहेत.
       शिबिर यशस्वी करण्यासाठी तहसीलदार सौदागर तांदळे, पुरवठा निरिक्षक तथा नायब तहसीलदार संदीप जाधव, मंडळ अधिकारी बाळासाहेब जगताप, अव्वल कारकून एस.जी.पवार, महसूल सहाय्यक पी.जी.कानडे,औदुंबर गिरी, सुरेश वाघमारे, बाळु सोनवणे,अंकुश जाधव, तलाठी प्रशांत गुळवे, यांच्यासह सरपंच आदेश कोळी, सुजित हंगरगेकर, प्रदीप साळुंके,ग्रा.प.सदस्य मकरंद देशमुख, बाळासाहेब भाले, संजय महापुरे,यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
 
Top