काटी , दि . ९ : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटीसह सावरगाव, दहीवडी,केमवाडी, तामलवाडी परीसरात मागील महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात आली असून शेतकरी हवालदिल झाला आहे.
पावसाने उघडीप दिल्याने खरीप हंगामातील हजारो हेक्टर सोयाबीन,उडीद, तुर, भुईमुग,मुग आदी खरीप पिके सुकून चालली आहेत. पाझर तलाव कोरडे पडत आहेत. विहिर, बोअर वरुन शेतकरी आपली पिके वाचविण्यासाठी आटापिटा करित आहे. रात्रीची लाईट असल्याने सापाच्या भितीने अनेकांना जीव मुठीत धरून पाणी द्यावे लागत आहे.
मागील महिन्यापूर्वी चांगला पाऊस झाल्यामुळे खरीप पिके जोमदार होती त्यामुळे बळीराजा आनंदी होता. मागील वीस ते पंचवीस दिवसात अतिशय तुरळक प्रमाणात व रीमझीम झाला. अनेकांच्या सोयाबीन पिकावर पिकावर केसाळ आळी,पाने कुरतडणारी आळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकर्यांना मोठ्याप्रमाणात किटकनाशकांची फवारणी करावी लागली. पेरणीपूर्व मशागत, बीबीयाणे, खते,पेरणी,फवारणी,अंतर मशागत आदी खर्चाने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.बहूतेक शेतकऱ्यांनी विविध बँका कडून तसेच सावकाराकडून कर्ज घेऊनच वरील सर्व खर्च केलेला आहे.
पावसाअभावी ही पिके सुकून जात आहेत त्यामुळे काटीसह सावरगाव, दहिवडी केमवाडी, तामलवाडी भागातील शेतकरी अतिशय चिंताग्रस्त दिसून येत असून येत्या चार दिवसात पाऊस आला नाही तर परिसरातील खरीप हंगाम वाया जाण्याची भिती निर्माण झाली आहे.