अणदूर येथील रहिवासी व तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार सिद्रामप्पा नागप्पा आलूरे गुरुजी यांचे आज पहाटे उपचारादरम्यान सोलापूर येथील रूग्णालयात दुःखद निधन झाले.


आलूरे गुरुजीनी त्यांचे संपूर्ण आयुष्य एका ध्येयाने व तत्वाने व्यतीत करून येणाऱ्या पिढीपुढे आदर्श निर्माण केले आहे. आलूरे गुरूजी विज्ञान शाखेचे पदवीधर होते. ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी स्थानिक स्तरावर उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने अणदूर येथे शिक्षण प्रसारक मंडळची स्थापना करून तेथे मुख्याध्यापक पदावरून ज्ञान दान करण्याचे पवित्र काम केले, 

दरम्यान त्यांनी राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचा प्रचार व प्रसार करून तत्कालीन कॉंग्रेसची विचार धारा संपूर्ण जिल्ह्यात रूजवली होती. दरम्यान 1980 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली व ते भरघोस मताने विजयी झाले होऊन 1980 ते 1985 दरम्यान त्यांनी तुळजापूर तालुक्याचे नेतृत्व केले.

गुरुजीनी त्यांच्या संपूर्ण हयातीत विविध पदे भुषविली आहेत त्यात जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य, पंचायत राज समितीचे सदस्य, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा सदस्य, उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष, अणदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव, नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष, शिद्धेश्वर सहकारी बँकेचे आजन्म अध्यक्ष, शिखर बँकेचे १५ वर्षे संचालक व दोन वर्ष उपाध्यक्ष, तसेच येथील श्री. तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना चे चेअरमन आदी विविध पदावरून त्यांनी स्वतःची एक वेगळी प्रतिमा निर्माण केली होती.
तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील श्री महालक्ष्मी मंदिरासमोर होणारी पशू हत्या व व्यसन मुक्ती चळवळ राबवून त्यांनी अंधश्रध्दा निर्मूलन केलेले आहे.


आलूरे गुरूजी हे आदर्श मुख्याध्यापक होते शिवाय त्यांनी मुख्याध्यापक संघाचे नेतृत्वही केले होते.
अणदूर येथे उच्च शिक्षणाची सोय, गोरगरीब विद्यार्थ्यांना राहण्यासाठी साठी स्वतःच्या फंडातून वसतीगृह चालवले शिवाय अनाथ व अपंग मुलांना दत्तक घेऊन त्यांचे पालनपोषण व शिक्षण पूर्ण केले. स्वतःच्या ताटातील चतकोर भाकर दुसऱ्याच्या तोंडात घालून आनंदीत होणारा हाडाचा शिक्षक काळाच्या पडद्याआड गेल्याने सर्वत्र दुःख व हळहळ व्यक्त होत आहे.
आलूरे गुरूजींनी केवळ विद्यार्थी दत्तक घेतले नाहीत तर गरीब  विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे म्हणून त्यांनी त्यांच्या पगारातील व आमदारकीच्या पेन्शन मधील काही रक्क दत्तक विद्यार्थ्यांवर खर्ची घालून मदत केल्यामुळे आज अनेक गोरगरीब विद्यार्थी इंजिनिअर व डॉक्टर झालेले आहेत.


राष्ट्रीय आपत्ती वेळीही त्यांनी विविध गावे व गल्लीत फिरून निधी संकलीत करून संकटात सापडलेल्या जनतेस मदत केलेली आहे.  अणदूर गावात अनेक मोठे साहित्यिक, मोठे राजकीय नेते  कुलगुरू आदींना आणून त्यांचे विचार नागरिक व विद्यार्थ्यांपुढे ठेवून आदर्श निर्माण करण्याचे काम त्यांनी केले आहे.


आलूरे गुरूजीची कै. माजी आमदार शिवाजीराव पाटील बाभळगावकर, माजी कॅबिनेट मंत्री मधुकररावजी चव्हाण, माजी आमदार नरेंद्रजी बोरगांवकर यांच्याशी घनिष्ठ मैत्री होती. अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांना ती अनोखी व अविश्वसनीय वाटायची. 
तुळजापूर तालुक्यातील या चार नेत्यांचे राजकीय पटलावर मतभिन्नता होती मात्र वैयक्तिक जीवनात ते एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होणारे जीवाभावाचे मित्र होते.
गुरुजींनी केवळ शिक्षण व राजकारणच केले नाहीत तर त्यांनी तालुक्यात सर्वप्रथम बागायत शेतीचा प्रयोग करून द्राक्ष लागवडीस सुरुवात केलेली होती व त्यासाठी त्यांनी बाजारपेठ मिळवूनही दिली होती.
कुस्ती क्षेत्रालाही गुरुजींनी प्रोत्साहन देऊन अणदूर येथे कुस्ती परिषद भरवून पैलवानांना प्रोत्साहन दिले होते.
आलूरे गुरूजी व माजी आ. मधुकरराव चव्हाण यांनी हैद्राबाद संस्थानचे तत्कालीन मंत्री कै. फुलचंद गांधी व हैद्राबाद मुक्ती संग्रामचे स्वातंत्र्य सेनानी कै. स्वामी रामानंद तीर्थ आणि महाराष्ट्रतील माजी मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण, कै. विनायकराव पाटील, माजी मुख्यमंत्री कै. वसंतदादा पाटील, कै. मधुकरराव चौधरी, माजी मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाण  आणि कै. शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी आ. कै. शिवाजीराव पाटील बाभूळगाव, माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख, कै. देविसिंग चव्हाण गुरुजी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विद्यमान अध्यक्ष तथा केंद्रीय कृषिमंत्री मा शरदचंद्र पवार , माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर, माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या समवेत राहून सगळ्यांना पचणी पडणारे, रूचणारे व सर्वसामान्यांचा सर्वांगीण विकास करणारे समतोल राजकारण, समाजकारण व अर्थकारण केले. तुळजापूर येथील जाहीर सभेत तत्कालीन प्रधान मंत्री कै. इंदिरा गांधी यांनी गुरुजींच्या कार्याचे कौतुक केले होते. 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठनेही आलूरे गुरुजींना मराठवाडा भूषण पुरस्कार देऊन गौरव केलेला आहे. गुरुजी हे तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाच्या विधी सभेवर होते. अणदूरच्या खंडोबा मंदिरात उभ्या केलेल्या शाळेत दरवर्षी जवळपास तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आज हे शिक्षणाचे रोपटे वटवृक्ष झाले आहे. गुरुजी हळवे, माणसाला माणूस म्हणून जगायला भाग पडावे या करीता स्वतःच्या आचरणातून आदर्श निर्माण करणारे होते. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे त्यांचे जणू ध्येयच होते. स्वतःच्या ताटातील चतकोर भाकर दुसऱ्याच्या तोंडात घालून आनंदीत होणारे ऋषी तुल्य नेतृत्व काळाच्या पडद्या आड गेल्याने सर्वत्र दुःख व हळहळ व्यक्त होत आहे.

गुरुजींच्या आत्म्याला शांती मिळो ही श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी व खंडेराच्या चरणी  प्रार्थना.

शोकाकुल
बालाघाट शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक.
तसेच बालाघाट शिक्षण संस्था संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, नळदुर्ग.
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, तुळजापूर.

(शब्दांकन - प्रा. ॲड. पांडुरंग पोळे)
 
Top