वागदरी , दि . ८: एस.के.गायकवाड

  येडोळा ते नळदुर्ग अक्कलकोट रोडवरील येडोळा पाटी (कंदुरमळा)  रोडला जोडणारा बोरी नदीवरील के.टी.बंधारा गत वर्षी बोरी नदीच्या पुरामुळे निकामी झाल्यामुळे येथील ग्रामस्थाना दैनंदिन व्यवहारासाठी  येडोळा ते नळदुर्ग ये जा करण्याकरीता मोठी आडचण निर्माण झाल्यामुळे या नदीवर नवीन पुलाचे बांधकाम त्वरीत करावे अशी मागणी येथील ग्रामस्थातून होत आहे.


  बालाघाट पर्वत रांगेच्या टेकडीवर  वसलेल्या तुळजापूर तालुक्यातील मौजे येडोळा या गावाच्या कडेने बोरी नदी वहाते. गावच्या चारही बाजूंनी डोंगर दरी असल्याने या गावची आवस्धा एका बेटा प्रमाणे आहे. येथे इयत्ता ५ वी पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. पुढील शालेय व महाविद्यालयीन शिक्षणाकरिता विद्यार्थ्यांना नळदुर्ग, अणदुर आदी ठिकाणी जावे लागते. तर छोट्या मोठ्या व्यवसायीकाना, ग्रामस्थाना आपल्या दैनंदिन व्यवहारासाठी नळदुर्गलाच यावे लागते.


नळदुर्गला येण्या जाण्यासाठी येडोळा ते येडोळा पाटी कंदुरमळा या ठिकाणी दोन कि.मी.अंतर पार करून नळदुर्ग ते अक्कलकोट जाणाऱ्या महामार्गावर यावे लागते.परंतु  येडोळा ते येडोळा पाटी या रस्त्यावर गावालगत डोंगराच्या कडेने बोरी नदी वहाते.यामुळे पावसाळ्यात हा रस्ता नदीच्या पाण्यामुळे बंदच पडतो .पर्यायी व्यवस्था म्हणून शासनाने या नदीवर के.टी.बंधारा बांधून रस्त्याला जोडणारा पुल बांधला होता. परंतु गतवर्षी २०२० मध्ये सरत्या पावसाने उग्र रूप धारण केल्याने अतिवृष्टी झाली आणि बोरी नदीला न भूतो न भविष्यती म्हटल्याप्रमाणे महापुर आला. नदी काटच्या शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान तर झालेच. पण येडोळा  ते येडोळा पाटी या रस्त्याला जोडणारा के.टी.बंधारा वाहुन  गेला. त्यामुळे येथील ग्रामस्थाना नळदुर्गला येण्या जाण्यासाठीचा मार्ग बंद झाला. जवळपास दहा कि.मी.वळसा घालून लोहगाव जोड मार्गाने नळदुर्गला ये जा करावे लागत आहे. केवळ पक्क्या रस्त्याअभावी अद्याप  येडोळा गावात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची लाल परी (एस.टी.बस)आलीच नाही. 

नदीला आलेल्या महापुरानंतर केवळ सहानुभूती म्हणून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीनी,वरिष्ठ अधिकाऱ्यानी येडोळा गावाला भेट दिली. नदीवर नव्याने मोठा पुल बांधून रहदारीसाठी पक्का रस्ता करून देण्यात येईल असे आश्वासनही दिले गेले. परंतु या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आले,  तरी अद्याप  पुलाचे काम सुरु झाले नाही. तरी शासनाने याकडे लक्ष देऊन बोरी नदीवरील पुलाच्या बांधकामास त्वरित सुरूवात करावी अशी मागणी ग्रा.प.सदस्य आबासाहेब जाधव सह ग्रामस्थानी केली आहे.

हाच तो पुल गतवर्षी पुरात वाहुन गेला
 
Top