काटी , दि . २४ : उमाजी गायकवाड
तामलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत गावात जिल्ह्यत प्रथमच ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित होत आहे. त्यामुळे चोरी, दरोडेखोरांना जेरबंद करण्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणा उपयुक्त ठरणार आसल्याची माहिती ग्राम सुरक्षा यंत्रणा संचालक डि.के. गोर्डे यानी दिली.
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे जिल्हा ग्रामीण पोलीस दल व जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने तामलवाडी पोलीस ठाण्या अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे, पोलीस उपनिरीक्षक एस.जी.बनसोडे, गोपनीय पोलीस अंमलदार आकाश सुरनर यांच्यासह तामलवाडी पोलीस स्टेशनचा सर्व स्टॉफ यांच्या प्रयत्नातून तामलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या 27 गावातील ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रभावीपणे राबविण्यासाठी तथा ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी शुक्रवार दि.(24) रोजी सकाळी 11:30 वाजता येथील सरस्वती मंगल कार्यालयात पोलीस स्टेशन अंतर्गत 27 गावातील पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, पोलीस कर्मचारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणेचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते.
ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी.के. गोर्डे यांनी उपस्थितांना यंत्रणेचे प्रात्यक्षिक दाखवले. यावेळी ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डि.के. गोर्डे उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, मागील काही वर्षात पुणे, नाशिक, सातारा, अहमदनगर जिल्ह्यातील गावे ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी झाली असून सर्व नागरिक ग्राम सुरक्षा यंत्रणेचे ॲपद्वारे आपापले मोबाईल नंबर नोंदवून यंत्रणा वापरत असल्याची माहिती देऊन
ग्रामीण भागात सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रभावी ठरत असल्याचे सांगितले.
जिल्ह्यात ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित होणार आहे.यामुळे चोरी,दरोडा यासारख्या घटनांमध्ये तात्काळ मदत मिळणार आहे.चोर,दरोडेखोर जागेवर जेरबंद करण्यास ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे.
या यंत्रणेच्या माध्यमातून संकट काळात स्वतःच्या मोबाईलवरुन सर्व गावकऱ्यांना एकाच वेळी कॉलच्या माध्यमातून सुचना देणे, सावध करणे, किंवा मदतीला बोलावण्यासाठी हि यंत्रणा उपयुक्त असून पोलीस स्टेशन व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या गावात मालमत्तेसंदर्भात व शरीराविरुध्द होणारे गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी चोरी, दरोडे, आग, जळीतांच्या, आपत्कालीन परिस्थितीत, ग्रामसभा, सरकारी सुचना आदी घटनांमध्ये सर्वांना एकाचवेळी सुचना देण्यासाठी सर्वांसाठी वापरता येणारा टोल फ्री नंबर 18002703600 वर नोंदी केलेल्या नागरिकाने आपत्ती काळात फोन केल्यास त्याचा आवाज परिसरातील अनेक नागरिकांना त्वरीत मोबाईलवर ऐकू जातो.
परिसरातील नागरिकांना घटना घडत असतानाच घटनेची माहिती मिळाल्याने तातडीने मदत करणे व नुकसान टाळणे शक्य होते. ग्राम सुरक्षा यंत्रणेमुळे घटनाग्रस्त नागरिकांना परिसरातील नागरिकांची तातडीने मदत मिळणे,गावातील कार्यक्रम,घटना विनाविलंब नागरीकांना एकाच वेळी कळणे, अफवांना आळा घालणे, प्रशासनाला नागरिकांशी जलद संवाद साधता येणे, पोलीस यंत्रणेस कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य मिळणे असे फायदे असल्याचे सांगून गावासाठी यंत्रणा सुरु करणे व सहभागी होण्यासाठी सोपी पध्दत समजावून सांगितले.
या प्रात्यक्षिकास नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिल्याने येत्या काळात तामलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत 27 गावात हि यंत्रणा कार्यान्वित होणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी देऊन पोलीस अधीक्षकांना याबाबत संदेश देणार असल्याचे सांगितले.
यावेळी ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डि.के. गोर्डे, ग्राम सुरक्षा यंत्रणा विधायक अधिकारी उत्तम सुतार, तुळजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत सिंह मरोठ, पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे, पोलीस उपनिरीक्षक एस.जी.बनसोडे, गोपनीय पोलीस अंमलदार आकाश सुरनर, परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तामलवाडी पोलीसांनी परिश्रम घेतले.