मुरुम, ता. उमरगा, दि. २७ :
राज्यातील तीस शिक्षकांना त्यांच्या कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आदी क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सदर पुरस्कार वितरण सोहळा, जीवन गौरव मासिकाच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधनी, औरंगाबाद येथे रविवारी (ता. २२) रोजी पार पडला.
मुरुमच्या जिल्हा परिषद कन्या प्रशालेत कार्यरत असणाऱ्या सहशिक्षिका डॉ. वंदना जयराम जाधव यांचा औरंगाबाद येथे बोधी ट्री एज्युकेशनल फौंडेशन व जीवन गौरव मासिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत बाबा भांड आणि लातूरचे माजी खासदार प्रा. सुनील गायकवाड जीवनगौरव मासिकाचे प्रधान संपादक रामदास वाघमारे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. डॉ. वंदना जाधव यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील गुणवत्ता वाढ, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, त्यासाठी राबवले जाणारे उपक्रम, वृक्षारोपण-वृक्षसंवर्धन करिता केलेले विशेष प्रयत्न, कविता लेखन, प्रासंगिक लेखन आदी कार्याची दखल घेऊन त्यांना या संस्थेने पुरस्कारासाठी पात्र ठरविले आहे.
या प्रसंगी पुरस्कारार्थी शिक्षकांमधून डॉ. जाधव यांनी जीवन गौरव मासिकाच्या मार्फत केल्या जाणाऱ्या कार्याचा आढावा मनोगतातून मांडला. अध्यक्षीय समारोप प्रसंगी बाबा भांड म्हणाले की, शिक्षक विद्यार्थ्यांना नुसते घडवत नसतात तर आपल्या संस्काराने विद्यार्थ्याचे पूर्ण आयुष्य बदलून टाकतात, असे मौलिक विचार मांडले. उद्घाटक डॉ. सुनील गायकवाड यांनी आपल्या मनोगतात, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रथम संवेदनशील माणूस घडवावा, असे मत व्यक्त केले. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.