काटी , दि. २८ :उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील जागृत देवस्थान तथा ग्रामदैवत श्री नागनाथ महाराज यांच्या यात्रेला आषाढ अमावस्या ते श्रावण नागपंचमी या दरम्यान सुरू होणाऱ्या यात्रेला दि. 28 सकाळी श्री नागनाथ महाराज यांच्या मुर्तीला रुद्र अभिषेक व पंचआरती व भजन गायनाच्या कार्यक्रमाने कंकन बांधून उत्साहात प्रारंभ झाला.
मागील दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे येथील यात्रा साधेपणाने साजरी करण्यात आली होती. तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील प्रसिद्ध श्री नागोबा यात्रेस गुरुवारी उत्साहात प्रारंभ झाला. आषाढी अमावस्या गुरुवारी आल्याने या यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेले नाग, पाल, विंचू एकत्रित आले आहेत.
एकमेकांचे शत्रू समजले जाणारे नाग,पाल,विंचू हे नागोबा यात्रेत एकत्रित येत असल्याचे दृश्य प्रतीवर्षी पहावयास मिळते़ त्यांचा मुक्काम पाच दिवस मंदिरासमोर असेल, नागोबा देवस्थानचे मुख्य पुजारी कल्याण मल्लिकार्जुन खरगे महाराज यांनी सांगितले. सावरगाव येथील जागृत देवस्थान असलेल्या या नागोबा यात्रेला राज्याच्या कानाकोपर्यातून भाविक येथे दर्शनासाठी येतात. परंतु मागील दोन वर्षात या यात्रेस कोरोनाच्या संकटामुळे खंड पडला होता.
आजच्या काळात या यात्रेकडे सर्वधर्म समभावाचे प्रतीक म्हणून भाविकांमधून पाहिले जाते. नाग, पाल, व विंचू हे उभयचर एकमेकांचे कट्टर हाडवैरी समजले जाणारे मुके प्राणी आषाढ अमावस्या ते श्रावण नागपंचमी असे पाच दिवस एकत्र येऊ शकतात तर समाजातील लोकांनी सुध्दा एकत्रित येण्याचा संदेश देणारी ही यात्रा असल्याचे या यात्रेला दरवर्षी येणारे भाविक आवर्जून सांगतात.
सावरगाव येथे नागपंचमीला विविध प्रथा
येथे नागपंचमीच्या दिवशी प्रत्येकांच्या घरोघरी प्रथा वेगवेगळ्या असतात. या दिवशी अनेकांच्या घरी भाजी चिरण्यासाठी विळी तसेच, पोळी भाजण्यासाठी तव्याचा उपयोग केला जात नाही. काही घरांत प्रत्येकाने नदीवर जाऊन आंघोळ करण्याची पद्धत आहे. परंपरेनुसार ज्या प्रथा रुढ झाल्या आहेत, त्या आजही कायम आहेत. आजच्या धावत्या युगातही ग्रामीण भागावर रुढी, परंपरांचा पगडा कायम आहे. हेच या ग्रामीण भागातील ग्रामदैवतांच्या माध्यमातून दिसून येते. आषाढी अमावस्या ते श्रावण नागपंचमी दरम्यान होणाऱ्या या यात्रेसाठी हजारो भक्तगण याठिकाणी आजही दर्शनासाठी येतात.
पन्नास वर्षापासून डोके कुटूंबाचे विनामूल्य माळा बनविण्याचे कार्य अविरत सुरु
लिंबाऱ्याच्या पाल्यापासून गोलाकार माळा बनविण्याचे काम हरीदास विश्वनाथ डोके यांचे कुटुंबीय मागील पन्नास वर्षापासून विनामूल्य करीत असून ते कार्य आजतागायत सुरु आहे. डोके कुटुंबियांकडून लिंबाऱ्याच्या माळा बनविण्याचे काम सुरु आहे.या तयार केलेल्या माळा नागपंचमीदिवशी गण मिरवणुकीत भाविकांना वाटण्यात येतात. ही लिंबाऱ्याची माळ वर्षभर घरात अडकवतात त्यामुळे घरात सापांचा वावर होत नाही, अशी आख्यायिका आहे.
पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत नियोजनासाठी सज्ज
यंदा ही यात्रा 27 जुलै ते 2 ऑगस्ट रोजी होणाऱ्या यात्रेसाठी येथील ग्रामपंचायत प्रशासन व पोलिस प्रशासन सज्ज झाले असून परिसरातून येणाऱ्या वाहनांची स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून यंदा होणाऱ्या संभाव्य यात्रेतील गर्दीच्या पार्श्वभूमीवर येथील भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, सरपंच रामेश्वर आबा तोडकरी, जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडीत, रमेश काढगावकर, नेताजी कदम, अण्णा लिंगफोडे, बंडू तानवडे, सिध्देश्वर तोडकरी, बत्तु पाटील, महारुद्र अक्कलकोटे, बंडु तेली, सोमनाथ तोडकरी, पिंटू तानवडे, महेश स्वामी, बाळासाहेब डोके आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक घेऊन नियोजनासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच या यात्रेच्या पार्श्वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.