काटी , दि.२९: उमाजी गायकवाड

 तुळजापूर तालुक्यातील काटी ग्रामपंचायत निवडणुकीसाठीचे आरक्षण शुक्रवार दि.29 रोजी सकाळी अकरा वाजता प्राधिकृत अधिकारी ए.आर.यादव, सरपंच आदेश कोळी, तलाठी प्रशांत गुळवे, ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात जाहीर करण्यात आले.

 2011 च्या जनगणनेनुसार काटी गावची एकूण लोकसंख्या ही 6875 असून काटी ग्रामपंचायतीचे एकूण पाच वॉर्ड असून  प्रत्येक वार्ड निहाय 3 सदस्य संख्या याप्रमाणे 15 सदस्य संख्या आहे. तर अंदाजे जवळपास 4800 मतदार आहेत. यंदाही सरपंचपद थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने सरपंचपदाच्या आरक्षणावर इच्छुक नजर ठेवून आहेत.

यावेळी जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीत  प्रभाग क्र.1 मध्ये ओबीसी स्त्री 1, सर्वसाधारण स्त्री 1, सर्वसाधारण पुरुष 1, प्रभाग क्र. 2 मध्ये एससी स्त्री 1, सर्वसाधारण 2, प्रभाग क्र.3 मध्ये ओबीसी स्त्री 1, सर्वसाधारण स्त्री 1, सर्वसाधारण 1, प्रभाग क्र.4 मध्ये ओबीसी 1, एससी स्त्री 1, सर्वसाधारण 1, तर प्रभाग क्र.5 मध्ये एससी 1, ओबीसी 1, सर्वसाधारण स्त्री 1 याप्रमाणे आरक्षण जाहीर झाले आहे. 

यंदा ग्रामपंचायत निवडणुकीत अनेकजण निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता असून अनेकजण मातब्बर गुडग्याला बाशिंग बांधून तयार असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत तीन ते चार पॅनल निवडणुक रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोणाच्या सोयीचे तर कोणाच्या गैरसोयीचे आरक्षण पडल्याने कही खुशी कही गम अशी स्थिती निर्माण झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत मावळत्या ग्रामपंचायत सदस्यांमधून सुध्दा अनेक ग्रामपंचायत सदस्य पुन्हा नशीब आजमावण्याची शक्यता आहे.
   

 तालुक्यातील लक्षवेधी समजली जाणारी काटी ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, सरपंच आदेश कोळी,संजय महापुरे, ग्रा.पं. सदस्य अनिल बनसोडे, जिंतेद्र गुंड,  बाळासाहेब भाले, मकरंद देशमुख, कॉंग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, करीम बेग, सुजित हंगरकर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष साळुंके आदी मात्तबर समजले जाणारे पदाधिकारी ग्रामपंचायची सत्ता आपल्याकडे खेचून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार हे निश्चित. माजी पंचायत समिती सदस्य संजय देशमुख यंदाच्या होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांचे स्वतंत्र पॅनल उभे करणार का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.त्यामुळे आगामी काळात काटी ग्रामपंचायत निवडणुकीने राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.
 
Top