उस्मानाबाद , दि.२९
शासकीय सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीच्या दिवशीच सर्व शासकीय देयके अदा केली जाणार असल्याची माहिती उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये वरिष्ठ सहाय्यक तथा भंडारपाल मधुकर सदाशिव कांबळे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
25 वर्ष 7 महिने मधुकर सदाशिव कांबळे हे उस्मानाबाद जिल्हा परिषदेत कार्यरत होते. त्यांच्याविषयी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता म्हणाले, एखाद्या सेलिब्रिटी प्रमाणे कांबळे यांनी जिल्हा परिषदेत काम केले.सर्वांशी समन्वय साधून स्वतःची ओळख निर्माण केली हे त्यांचे मोठेपण आहे. भांडार विभागातील अडचणी आणि त्रुटी पूर्ण करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत असे गुप्ता म्हणाले.
जिल्हा परिषदेतून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा समाप्ती दिवशीच सर्व शासकीय देय अदा केली जातील असे गुप्त यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी चालक संघटना, परिचर संघटना,एकात्मिक बालविकास विभाग,ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष जी.बी.राजपूत यांच्यासह महादेव गंगणे (अंबाजोगाई) आणि भाटशिरपुरा ग्राम पंचायतीच्या सरपंच सुनिता दिलीप वाघमारे यांनी गावकऱ्यांच्या वतीने कांबळे यांचा सपत्नीक सत्कार केला.
या कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन सूर्यकांत भुजबळ, कार्यकारी अभियंता (बांधकाम) नितीन भोसले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती शिंदे यांच्यासह जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती.