तुळजापूर दि. १९ डॉ. सतीश महामुनी
मागील महिनाभरामध्ये तुळजापूर तालुक्यात 27 दिवस सलग पाऊस पडला यामुळे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले सोयाबीन पीक हातातून गेली असून शेतकरी आर्थिक दृष्ट्या अडचणीत सापडलेला आहे मदत मिळण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसमोर अनेक समस्या उभारले आहेत. शासन कधी आणि किती मदत करणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
तुळजापूर तालुक्यामधील जिल्हा परिषद मतदार संघ निहाय जळकोट, मंगरूळ, अणदुर, काक्रंबा, नंदगाव, काटी, काटगाव, आणि सिंदफळ , शहापूर या कार्यक्षेत्रामध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे. पाऊस पडण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे सर्वांच्या शेतामध्ये पाणी उभे राहिले आणि सोयाबीन पीक वाया गेले.
एक पिवळे पडणे आणि नष्ट होणे या प्रक्रिया झालेले आहेत. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी आणि पेरणीच्या पूर्वतयारीसाठी केलेला खर्च वाया गेला आहे. पेरणी केल्यानंतर फवारणीसाठी केलेला खर्च देखील यामध्ये समाविष्ट करावा लागणार आहे. खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आणि जिल्हास्तरावरून जिल्हाधिकारी आणि तत्सम अधिकारी यांच्याकडून पाहणी करण्यात आल्याचे वृत्त आहे. परंतु नुकसानीची नोंद घेण्यासाठी महसूल प्रशासनाकडे अत्यंत अपुरी व्यवस्था आहे. या परिस्थितीमध्ये शेतकरी गोंधळलेला असून मदत मिळेल की नाही या विवंचनेत वावरत आहेत.
यापूर्वी सर्वच राजकीय पक्षाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. विधानसभेचे अधिवेशन सुरू असून अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही मागणी विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लावून धरले आहे. याचे परिणाम शुक्रवारी तुळजापूर तालुक्यात पहावयास मिळाले जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. कौस्तुभ दिवेगावकर यांनी तुळजापूर तालुक्यातील कसई आणि भातंबरी या दोन गावांना भेट देऊन नुकसानीची पाहणी केल्याचे समजते. परंतु पाहणी केल्यानंतर कोणता अहवाल शासनाकडे गेला याकडे शेतकऱ्याचे लक्ष लागले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी पाहणी न करता पंचनामे न करता सरसकट 75 हजार रुपये हेक्टरी मदत करण्याची मागणी केलेली आहे. याच मागणीचा पुनर्विचार शेतकऱ्याकडून करण्यात येत आहे. शेतकरी मदत मिळावी या प्रतीक्षेत असल्यामुळे पाहणी केल्यानंतर गेलेला अहवाल आणि प्रत्यक्षात होणारी मदत याविषयी उलट सुलट चर्चा सुरू आहे.