नळदुर्ग, दि. २१: विलास येडगे
जैन धर्मियांचे अतीशय पवित्र असे सिद्धक्षेत्र श्री सम्मेद शिखरजी हे पर्यटन क्षेत्र म्हणुन घोषित केल्याचा झारखंड सरकारच्या निर्णयाचा नळदुर्ग सकल जैन समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला असुन याच्या निषेधार्थ दि.२१ डिसेंबर रोजी नळदुर्ग शहरातील जैन बांधवांनी आपली दुकाने बंद ठेऊन झारखंड सरकारचा जाहीर निषेध केला आहे. याबाबतचे निवेदन तुळजापुर तहसिलदारांना देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, जैन धर्मियांचे २४ तिर्थकरापैकी २० तीर्थंकर ज्या पवित्र भुमीत मोक्षाला गेले अशा झारखंड राज्यांतील मधुबन (जिल्हा गिरडोह) येथील महा पर्वतराज श्री सम्मेद शिखरजी क्षेत्र झारखंड सरकारने पर्यटन क्षेत्र म्हणुन घोषित केले आहे. या अनुषंगाने त्याठिकाणी नॉनव्हेज हॉटेल्स, पब बार व इतर अशा बऱ्याच मनोरंजक गोष्टी सुरू होतील की ज्या अहिंसा तत्वाच्या एकदम विरुद्ध असणार आहेत.
जैन समाजातील प्रत्येक व्यक्ती आयुष्यात एकदा तरी श्री सम्मेद शिखरजी येथे जाऊन २० तिर्थकर पवित्र मोक्ष भुमीवर पहाड वंदना अनवाणी करण्याची इच्छा बाळगतो. परंतु सरकारच्या या निर्णयामुळे जैन समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र भुमीचे पावित्र्य धोक्यात आले असुन जैन समाजाच्या अस्मितेवर घाला घालण्याचा हा प्रयत्न आहे. या निर्णयामुळे जैन समाजामध्ये संतापाची लाट पसरली आहे.
झारखंड सरकारच्या या निर्णयाचे नळदुर्ग शहर व परीसरातील सकल जैन मंदिर ट्रस्ट, संघटना, युवक व महिला मंडळ, शैक्षणिक संस्था यांनी निषेध केला आहे. जैन समाजाच्या भावनांचा आदर करून झारखंड सरकारने हा निर्णय बदलावा अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर नळदुर्ग शहर सकल जैन समाजाचे अध्यक्ष सुधीर पाटील, उपाध्यक्ष प्रविण कासार, नितीन कासार, एन. व्ही. यादगिरे, अजित पाटील, शितल पाटील, मयुर पाटील, सुरज पाटील, सिद्धपा शेटगार, बाहुबली शेटगार, इंद्रजित पाटील, केवल पाटील यांच्यासह जैन बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.