पिकस्पर्धा रब्बी हंगाम 2023
ज्वारी,गहू,हरभरा,करडई व जवस या पिकांचा स्पर्धेत समावेश, डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज मागविले
धाराशिव,दि.23
राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. उत्पादकतेत वाढ करण्यात येते.अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास,त्यांची इच्छाशक्ती व मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल.तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल,हा उद्देश ठेवून राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.
वंचीत,दुर्लक्षीत तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादन तंत्रज्ञानात वाढ होण्याची आवश्यकता विचारात घेऊन तसेच जास्तीत जास्त शेतकरी पीक स्पर्धांमध्ये सहभागी होतील या दृष्टिकोनातून रब्बी हंगाम 2023 पासून पिकस्पर्धा तालुका,जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येणार आहे.त्यानुसार कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन 2023 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी,गहू,हरभरा,करडई व जवस या पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
रब्बी हंगाम 2023 करीता ज्वारी,गहू,हरभरा,करडई व जवस या पाच पिकांचा पिकस्पर्धेत समावेश करण्यात आला आहे.
स्पर्धेसाठी पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत.स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतक-यांकडे स्वत:च्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे आवश्यक आहे. एकाचवेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थ्याच्या शेतावर त्या पिकाखाली किमान 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी विहित नमुण्यातील अर्ज (प्रपत्र - अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन,7/12, 8-अ चा उतारा,जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास),पिकस्पर्धेसाठी शेतक-याने संबंधित 7/12 वरील घोषीत केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकीत केलेला नकाशा आणि बँक खाते चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकीत प्रत आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.
रब्बी हंगाम पीक स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतीम तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.अर्ज दाखल करण्याच्या तारखेच्या दिवशी शासकीय सुट्टी असल्यास त्यापुढील शासकीय सुट्टी नसलेली तारीख गृहीत धरण्यात यावी. तालुकास्तर,जिल्हास्तर व राज्यस्तरावरील पीकस्पर्धा निकाल-प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते निवडण्यात येतील.पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम 300 रुपये वव आदिवासी गटासाठी रक्कम 150 रुपये याप्रमाणे स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क राहील.
रब्बी हंगाम 2023 साठी सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिसाचे स्वरुप पुढीलप्रमाणे आहे. तालुका पातळीवर पहिले बक्षिस 5 हजार रुपये, द्वितीय क्रमांक 3 हजार रुपये तर तृतीय क्रमांक 2 हजार रुपये आहे. जिल्हा पातळीवर पहिले बक्षिस 10 हजार रुपये, द्वितीय बक्षिस 7 हजार रुपये व तृतीय बक्षिस 5 हजार रुपये आहे.राज्य पातळीवर पहिले बक्षिस 50 हजार रुपये, द्वितीय बक्षिस 40 हजार रुपये व तृतीय बक्षिस 30 हजार रुपये आहे.
दुय्यम तसेच पौष्टिक तृणधान्य पिकाच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्हावी याकरीता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक स्पर्धत सहभागी व्हावे,असे आव्हान कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.
पीक स्पर्धेबाबत अधिक माहीतीसाठी शेतकऱ्यांनी संबधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयास संपर्क साधावा किंवा महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.