नळदुर्ग शहरवासियाना दररोज पाणीपुरवठा होणार
शहराच्या चौफेर विकासाकरिता प्रामाणिक प्रयत्न - आमदार पाटील
नळदुर्ग,दि. १४ :
शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न निकाली निघणार असुन शहरवासीयांचा हा संघर्ष आता थांबणार आहे.यापुढे शहराला दररोज पाणी मिळेल असे सांगुन
शहराच्या विकासाकरिता शासन दरबारी पाठपुरावा करुन भरघोस निधी उपलब्ध करुन दिले व चौफेर विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मंगळवारी नळदुर्ग येथे बोलताना सांगितले.
नळदुर्ग येथे शहराच्या अमृत २.० योजने अंतर्गत मंजूर नवीन पाणी पुरवठ्याच्या विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले. भविष्यातील ३० वर्षांची गरज लक्षात घेऊन नळदुर्ग शहराच्या पाणी पुरवठ्याची आखणी करण्यात आली आहे. त्या अंतर्गत ७ जलकुंभ, जलशुध्दीकरण केंद्र, पंप हाऊस आणि जवळपास ५७ किलोमीटर अंतराची पाणी पुरवठा व्यवस्थेचे काम हाती घेण्यात आले आहे. धरण उशाला, कोरड घशाला अशी नळदुर्ग वासीयांची अवस्था होती.
यावर प्रभावी तोडगा काढत शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी आपल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून ४३ कोटी ६७ लाख रूपयांच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे शहरवासीयांना दररोज पाणी मिळणार आहे. पुढील टप्प्यात नळाद्वारे २४ तास पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचा प्रयत्न राहणार आहे.
महायुती सरकारच्या माध्यमातून शहर विकासाकरिता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. नळदुर्ग एक ऐतिहासिक वारसा असलेले पर्यटनस्थळ आहे. त्यादृष्टीनेही शहर विकासाचा प्रयत्न सुरू आहे. नळदुर्ग भुईकोट किल्ल्याला दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात. त्या अनुषंगानेच शहरात महात्मा बसवेश्वर स्मारक (बसवसृष्टी), वसंतराव नाईक यांचे स्मारक, मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यातील शहिद बचित्तरसिंग यांच्या स्मारकाचेही काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी निधी उपलब्ध झाले आहे.
शहरातील रस्त्यांकरिता ९५ कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे. रस्त्यांची कामे प्रगती पथावर असून २ कोटी रूपये खर्चून शहरात मोठा शादीखाना बांधण्यात येत आहे. गोरगरीब कुटुंबांना त्याचा मोठा लाभ होणार आहे. वर्ग-२ जमिनीचा महत्वपूर्ण प्रश्न महायुती सरकारने निकाली काढल्यामुळे शहरातील एक हजार ६४ एकर जमीन वर्ग-१ मध्ये येणार आहे. होर्टी येथे २५० एकर जमिनीवर एमआयडीसी उभारली जाणार आहे. ड्रोनच्या माध्यमातून एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी या जमिनीचा सर्व्हे केला आहे. शहरानजीक देखील नवीन एमआयडीसी साठी आपले प्रयत्न सुरू आहे.
अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला कबाल्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. सुमारे हजार कुुटुंबियांना कबाले वाटप केले जाणार आहेत. प्रतिनिधिक स्वरूपात या कार्यक्रमात आपल्या हस्ते ५ नागरिकांना कबाल्याचे वाटप करण्यात आले. तसेच व्यायाम शाळेसाठी २५ लाख रूपये आणि वडार समाजाच्या सभामंडपासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
अनेक वर्षांपासून नळदुर्ग शहर व परिसरातील ४० गावांसाठी अप्पर तहसील कार्यालयाची मागणी केली जात आहे. लवकरच अप्पर तहसील कार्यालयाची सकारात्मक बातमी देण्यात येणार आहे. आजवर शहराच्या इतिहासात कधी नव्हे, एवढा १५४ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पर्यटन वृध्दी, तरूणांना रोजगार यासाठी नियोजनबध्द प्रयत्न सुरू आहेत. नळदुर्ग शहरासाठी जे जे चांगले करता येईल ते करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू आहेत.
यावेळी भाजपा नेते सुशांत भूमकर, माजी जि. प. सदस्य गणेश सोनटक्के, दीपक आलुरे, माजी उपनगराध्यक्ष नय्यर जहागिरदार, माजी नगरसेवक संजय बताले, भाजपा शहराध्यक्ष धिमाजी घुगे, रणजितसिंह ठाकूर, माजी शहराध्यक्ष पद्माकर घोडके, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सचिव श्रमिक पोतदार, निरंजन राठोड, कैलास चव्हाण, छमाताई राठोड, विनायक अहंकारी, बसवराज धरणे, सुनिल बनसोडे, गौस शेख, रियाज शेख, एस.के.बागवान, अक्षय भोई, बबन चौधरी, गणेश मोरडे, बंडोपंत पुदाले, सागर हजारी यांची उपस्थिती होती.