विशेष लेख :                                                                 योजनादूत : महाराष्ट्रातील तरुणांना महिन्याला 10 हजार रुपये देणारा उपक्रम

 

महाराष्ट्र राज्याचे धोरण हे नेहमीच लोककल्याणाचे असते. शासन हे विविध स्तरावरील लोकांसाठी विविध कल्याणकारी योजना तयार करत असते. त्यांची अंमलबजावणी व्यवस्थितपणे राबविण्याचा शासनाचा मानस असतो. बऱ्याच लोककल्याणकारी योजना ह्या समाजातील तळागाळातील घटकापर्यंत पोहोचण्यास अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात. शासन राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी खेडो-पाड्यापर्यंत, वाडी-वसतीपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाचे मुख्यमंत्री योजनादूत आता काम करणार आहेत. 

राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार, प्रसिध्दी करुन त्यांचा जास्तीत-जास्त नागरीकांना लाभ मिळवून देण्यासाठी 50 हजार योजनादूत नियुक्त करण्यात येणार आहेत.

कार्यक्रमाची ठळक रुपरेषा:-

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे “ मुख्यमंत्री योजनादूत” कार्यक्रम राबविला जाणार आहे. राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरिता मुख्यमंत्री योजनादूत नेमले जातील. ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1  व शहरी भागात 5000 लोकसंख्येसाठी 1 योजनादूत या प्रमाणात एकूण 50 हजार योजनादूतांची निवड करण्यात येईल. मुख्यमंत्री योजनादूतास प्रत्येकी 10,000 प्रती महिना एवढे  मानधन देण्यात येईल (प्रवास खर्च, सर्व भत्ते समावेशित). निवड झालेल्या मुख्यमंत्री योजनादूतासोबत 6 महिन्यांचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढविण्यात येणार नाही.

मुख्यमंत्री योजनादूताच्या निवडीसाठी पात्रतेचे निकष :-

 वयोमर्यादा 18 ते 35 वयोगटातील उमेदवार यासाठी पात्र असतील. शैक्षणिक अर्हता- कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर उत्तीर्ण असावा. संगणक ज्ञान आवश्यक असावे. उमेदवाराकडे अदययावत मोबाईल असणे आवश्यक आहे. उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे.

योजनादूत निवडीसाठी उमेदवाराने सादर करावयाची कागदपत्रे:-

विहित नमुन्यातील “मुख्यमंत्री योजनादूत” कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधारकार्ड. पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे/ प्रमाणपत्र इ.,अधिवासाचा दाखला (सक्षम यंत्रणेने दिलेला)वैयक्तिक बँक खात्याचा तपशिल, पासपोर्ट साईज फोटो व हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) इत्यादी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री योजनादूताची नेमणूक प्रक्रिया:-

 उमेदवारांच्या नोंदणीची व प्राप्त अर्जांच्या छाननीची प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्यसंस्थांमार्फत ऑनलाईनरीत्या पूर्ण करण्यात येईल. सदरची छाननी उपरोक्त परिच्छेदात नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार करण्यात येईल. ऑनलाईनरीत्या प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येईल. जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने, प्राप्त अर्जांशी संबंधित उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करतील (यामध्ये उमेदवारांची शैक्षणिक व वयोमर्यादेविषयक मूळ कागदपत्रे तपासण्यात येतील). त्यानंतर प्रत्येक उमेदवाराबरोबर 6 महिन्याचा करार केला जाईल. जिल्हा माहिती अधिकारी  हे  शासकीय योजनांच्या माहिती संदर्भात पात्र उमेदवारांचे समुपदेशन व निर्देशन (Orientation) करतील. जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहायक आयुक्त, (कौशल्य विकास रोजगार) व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 /शहरी भागात 5 हजार लोकसंख्येसाठी 1 या प्रमाणात उमेदवारांना योजनादूत म्हणून पाठवतील.

निवड झालेल्या योजनादूताने करावयाची कामे:

योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील. प्रशिक्षित योजनादूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे त्यांच्यावर बंधनकारक राहील.  योजनादूत राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी करतांना ग्राम पातळीवरील यंत्रणांशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करतील.

 

श्रीकांत चंद्रकांत देशमुख

जिल्हा माहिती कार्यालय, धाराशिव


 
Top