विठ्ठलसाईचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा शरण पाटील व  सौ. संपदा शरण पाटील यांच्या हस्ते संपन्न 
                            
मुरूम, ता. उमरगा, दि. २  : 

येथील श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचा हंगाम २०२४-२५ साठीचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा पाडव्याच्या शुभमुहूर्तावर कारखान्यात शनिवारी  रोजी उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरण पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. संपदा शरण पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. 

कारखान्याचे चेअरमन तथा माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या हंगामासाठीची यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. यावर्षी कारखाना कार्यक्षेत्रात लागण व खोडवा मिळून ६ हजार हेक्टर ऊसाची नोंद झाली आहे. यापासुन जवळपास ४ लाख मेट्रिक टन ऊसाचे उत्पादन होईल असा अंदाज आहे. यासाठी पुरेशा वाहतुक यंत्रणेचे नियोजन करण्यात आले आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊसाची उपलब्धता व गेटकेन विभागातील उपलब्ध होणाऱ्या ऊस विचारात घेवून कारखान्याच्या संचालक मंडळाने ४ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

 कारखान्याच्या गळीत हंगामाच्या मोळी पुजन कार्यक्रम सोमवारी (ता.४) रोजी आयोजित करण्यात आला आहे. या हंगामात कार्यक्षेत्रातील व कारखाना लगतच्या गेटकेन विभागातील ऊसाचे गाळप करून गाळपास आलेल्या ऊसास योग्य भाव देणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन  बसवराज पाटील यांनी यावेळी दिली. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापुराव पाटील, गीता पाटील, श्वेता पाटील, स्मिता पाटील, कारखान्याचे व्हाईस चेअरमन सादीकसाहेब काझी, कारखान्याचे संचालक केशव पवार, माणिक राठोड, शब्बीर जमादार, विठ्ठल बदोले, राजीव हेबळे, दत्तू भालेराव, शिवलींग माळी, अँड. विरसंगप्पा आळंगे, अँड. संजय बिराजदार, प्राचार्य डॉ. दिलीप गरूड, संगमेश्वर पत्रिके, कार्यकारी संचालक एम. बी. अथणी आदींची प्रमुख उपस्थिती होती.  याप्रसंगी कारखान्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी व कामगार उपस्थित होते.
 
Top