सामूहिक जलव्यवस्थापनाचा उत्सव!

‘जलस्पर्धा 2025’ पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात


धाराशिव,दि.११

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘जलस्पर्धा 2025’ पुरस्कार वितरण सोहळा धाराशिव येथे जिल्हा नियोजन भवन सभागृहात उत्साहात पार पडला. या समारंभात पाणी व्यवस्थापन आणि संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या जिल्ह्यांतील गावांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रम वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (वॉटर), पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन, धाराशिव जिल्हा प्रशासन, इंडिया क्लायमेट कोलॅबरेटिव्ह, आणि इंडसइंड बँक लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या पुरस्कार सोहळ्यास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने, जिल्हा जल जीवन मिशन अधिकारी मोहन सरवदे, स्वच्छ भारत मिशनचे हनमंत गादगे, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणाच्या श्रीमती मनीषा डोंगरे, तुळजापूर येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे संचालक प्रा. रमेश जारे, वॉटर संस्थेचे कार्यकारी संचालक प्रकाश केसकर, इंडिया क्लायमेट कोलॅबरेटिव्ह व इंडसइंड बँक लिमिटेड या देणगीदार संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सोेहळ्यात राज्य शासनाच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले.

स्पर्धेचे समन्वयक डॉ. ईश्वर काळे यांनी स्पर्धेची प्रक्रिया आणि उद्दिष्टे स्पष्ट केली. ही स्पर्धा केवळ बक्षिसांसाठी नाही, तर जिल्ह्यातील गावांना जलव्यवस्थापन सुधारण्यासाठी पूरक आणि उत्साहवर्धक वातावरण निर्माण करण्यासाठी आहे. पारितोषिकाची रक्कम फक्त सार्वजनिक जमिनीवरील मृद व जलसंवर्धन उपचारांची देखभाल, दुरुस्ती किंवा नव्याने उभारणीसाठी वापरता येईल, तसेच गट ग्रामपंचायतींच्या बाबतीत, पारितोषिकाची रक्कम फक्त विजयी गावाने वापरायची असून ती इतर गावांसाठी वापरता येणार नाही.

यावेळी डॉ. मैनाक घोष म्हणाले, स्पर्धेत पारितोषिक विजेत्या यशस्वी गावांनी वापरलेली प्रक्रिया इतर गावांनी आत्मसात करावी, ज्यामुळे भविष्यातील पाणी प्रश्नांचा आपल्याला यशस्वीपणे मुकाबला करता येईल प्रा. रमेश जारे यांनी जलव्यवस्थापनात लोकसहभागाचे महत्व विषद केले. वॉटर संस्थेचे कार्यकारी संचालक प्रकाश केसकर, म्हणाले की, जर गावाकडे जलक्रेडिट (जल व्यवस्थापनाची क्षमता) चांगले असेल, तर बँका आणि संस्था त्यांच्या पाठीशी उभ्या राहतात.

संजय खंदारे यांनी त्यांच्या संदेशामध्ये या जलस्पर्धेचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले कि गावस्तरावरील परीमाणकारक जलव्यवस्थापन हे कोणत्याही शासकीय योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अत्यावश्यक आहे. विशेषतः जल जीवन मिशनच्या कामांची शाश्वतता आणि अटल भूजल योजनेचे यश हे जलसुरक्षेवरच अवलंबून आहे, म्हणून या जलस्पर्धेचा विस्तार होणे गरजेचे आहे. महाराष्ट्र हे वॉटर गव्हर्नन्स स्टँडर्ड (जल कारभाराचे मानक) स्वीकारणारे पहिले राज्य आहे, आणि देशपातळीवर जलव्यवस्थापनाच्या कार्यक्रमांत आणि धोरणांत या मानकाचा समावेश करण्याची गरज आहे.

जलस्पर्धा आणि पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी वॉटर संस्थेच्या धाराशिव विभागाचे व्यवस्थापक अभीजित कवठेकर, त्यांचे सर्व सहकारी आणि वॉटर संस्थेच्या पुणे येथील कार्यालयाचे जयंत पाटील, अरुण डहाळे, आश्लेषा गायकवाड, नवनाथ घोडके यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वॉटर संस्थेच्या अंकिता यादव व आदेश ठोंबरे यांनी केले.

255 ग्रामपंचायतींचा सहभाग
ही आगळीवेगळी स्पर्धा गावांमध्ये जलस्वयंपूर्णता आणि पारदर्शक जलकारभारास चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आली होती. वॉटर संस्थेने विकसित केलेल्या ‘वॉटर गव्हर्नन्स स्टँडर्ड’ म्हणजेच जलकारभाराचे मानक यावर आधारित प्रश्नावालीचा स्पर्धेतील सहभागी गावांच्या मूल्यांकनासाठी वापर केला गेला. या जिल्हास्तरीय जलस्पर्धेत धाराशिव जिल्ह्यातील सुमारे 255 ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला. तसेच या जलस्पर्धेत पहिल्या सर्वोत्तम दहा गावांचा त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान करण्यात आला.

धाराशिव जलस्पर्धा 2025 चे विजेते
प्रथम क्रमांक खेड ता. धाराशिव (5 लाख रूपये), द्वितीय दाउतपूर ता. धाराशिव (3 लाख रूपये), तृतीय क्रमांकाचा पुरस्कार 1 लाख रूपये भांडगाव ता.परंडा आणि जवळगा मेसाई ता.तुळजापूर या गावांना प्रत्येकी 50 हजार रूपये विभागून देण्यात आला.
 
Top