लेखकाने अस्वस्थ करणारे लेखन करायला हवे -डॉ. पी. विठ्ठल                                                            

  "नानी" आकलन आणि आस्वाद" या समीक्षाग्रंथाचे डॉ.पी. विठ्ठल यांच्या  हस्ते प्रकाशन 

धाराशिव,दि.०१:उमाजी गायकवाड 

 लेखकाने अस्वस्थ करणारे लेखन करायला हवे.डॉ. मुरहरी केळे यांचा 'नानी ' हा त्यांच्या आईवरील चरित्रग्रंथ अस्वस्थ करणारा असून,  त्यात मराठवाड्यातील ग्रामीण भागातील कष्टाळू स्त्रीचे आयुष्य डॉ.केळे यांनी अतिशय सुंदर आणि प्रभावी पद्धतीने रेखाटले आहे. त्यावर हरिभाऊ कवडे यांनी "नानी: आकलन आणि आस्वाद" हा समीक्षाग्रंथ त्याच ताकदीने लिहून त्याला भक्कम आधार दिला आहे. चरित्र हे एखाद्या व्यक्तीचं नसतं, तर ते संस्कृती,परंपरेसह त्या परिसराचा इतिहासही असते,असे विचार  कवी आणि समीक्षक डॉ.पी.विठ्ठल यांनी व्यक्त केले.  

"नानी :आकलन आणि आस्वाद" या चरित्रग्रंथाचे प्रकाशन छत्रपती संभाजीनगर मधील महापारेषणच्या सभागृहात , नुकतेच सायंकाळी कवीआणि समीक्षक डॉ. विठ्ठल यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.सुधीर गव्हाणे हे होते.  यावेळी डॉ.मुरहरी केळे,महावितरणचे कार्यकारी संचालक दत्तात्रय पडळकर,डॉ.निर्मोही फडके,प्रा.मुकुंद वलेकर,  हरिभाऊ कवडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
       
आपल्या भाषणात डॉ.पी.विठ्ठल पुढे म्हणाले,चांगली समीक्षा वांड्मयीन व्यवहाराला धाक निर्माण करते.चांगला समीक्षक लेखकाला लेखनाचे भान प्राप्त करून देतो. हरिभाऊ कवडे यांनी 'नानी ' चरित्रग्रंथाची उत्तम आस्वादात्मक समीक्षा केली असून,  ती 'नानी 'चरित्रग्रंथाची उंची वाढविणारी आहे.
      
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना डॉ.निर्मोही फडके म्हणाल्या की, कोणत्याही साहित्यिकाची साहित्यकृती प्रकाशित झाल्यानंतर ती लेखकापुरती मर्यादित राहत नाही. त्या कलाकृतीवर चांगल्या व टीकात्मक प्रतिक्रिया येतात. लेखकाने त्याचे स्वागत केले पाहिजे. 'नानी 'हा उत्तम चरित्रग्रंथ असून,हरिभाऊ कवडे यांनी समीक्षाग्रंथात उत्तम मांडणी करून वाचकांच्या ज्ञानात भर घातली आहे. 'नानी 'चरित्रग्रंथाचा मानसशास्त्रीय व स्त्रीवादी दृष्टिकोनातून अभ्यास व्हायला हवा.प्रा.मुकुंद वलेकर यांनी 'नानी' हा वाचकांना हेलावून सोडणारा व श्रमसंस्कार रुजवणारा आदर्श चरित्रग्रंथ असल्याचे सांगितले. मानवी समाजात वाट्याला येणाऱ्या दुःख व संघर्षाची उत्तम उकल हरिभाऊ कवडे यांनी समीक्षाग्रंथात केल्याचे सांगून , समीक्षाग्रंथाची बलस्थाने सांगितली.
          
समारोप प्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना माजी कुलगुरू डॉ.सुधीर गव्हाणे म्हणाले, 'नानी ' हा चरित्रग्रंथ अत्यंत साध्या- सोप्या भाषेत असून, वाचकांना खिळवून ठेवण्याची ताकद या चरिञग्रंथात आहे.प्राध्यापक किंवा साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांकडूनच चांगले साहित्य लेखन होते असे नाही,तर ऊर्जा क्षेत्रासह समाजातील अनेक वेगवेगळ्या व्यवसायात आणि विविध कार्यालयांमध्ये काम करणारे अधिकारी,कर्मचारी देखील चांगल्या प्रकारे साहित्य लेखन करू शकतात.डॉ.मुरहरी केळे व हरिभाऊ कवडे यांच्या लेखनातून ते सिद्ध झाले आहे. 'नानी 'या मूळ चरित्र ग्रंथाबरोबरच 'नानी: आकलन आणि आस्वाद ' या समीक्षाग्रंथाचे भरभरून कौतुक करून,दोन्ही लेखकांना त्यांनी प्रोत्साहित केले.
      
कार्यक्रमाला दीप प्रज्ज्वलानाने सुरुवात झाली. प्रास्ताविकामध्ये हरिभाऊ कवडे यांनी समीक्षाग्रंथ लेखनामागची भूमिका सांगितली. "नानी" या चरित्रग्रंथाचे लेखक व संस्कृती प्रकाशनाचे प्रकाशक डॉ.मुरहरी केळे यांनी मनोगत व्यक्त केले. 

यावेळी महावितरणचे कार्यकारी संचालक दत्तात्रय पडळकर, लेखक आनंदा टकले व कवी गोविंद काळे यांनी मनोगते व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. दैवत सावंत यांनी केले. आभार डॉ. शिवाजी तिकांडे यांनी मानले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वासुदेव मुलाटे,प्राचार्य डॉ.रामकिशन दहिफळे,यज्ञवीर कवडे,महावितरणचे अनेक मान्यवर अधिकारी,कर्मचारी व शहरातील अनेक मात्तबर साहित्यप्रेमी उपस्थित होते.
 
Top