नळदुर्ग,दि.२४:
सकल गोर बंजारा समाजास अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समाविष्ठ करण्याच्या प्रमुख मागणीसाठी येत्या दि. २९ रोजी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाच्या निघणा-या मोर्चाबाबत पत्रके वाटप करुन बंजारा समाजात जनजागृती करण्याचा युध्दपातळीवर मोहीम राबविण्यात येत आहे.
अनेक मान्यवरानी तुळजापूर तालुक्यातील बहुतांश तांड्यावर प्रत्यक्ष भेटी गाठी घेत आहेत. त्याचबरोबर रानावनात काम करणा-या शेतमजूरापर्यंत पोहचुन त्यांना सविस्तर माहिती देण्याचे कौतुकास्पद काम होत असल्याने विविध ठिकाणी मान्यवराचे स्वागत केले जात आहे.या होणा-या मोर्चात बंजारा बांधव ,महिला भगिनींनी जास्तीत जास्त संख्येनी सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले.
तुळजापूर तालुक्यातील जखंणी तांडा,येडोळा तांडा, रामनगर, रामतीर्थ , फुलेवाडी, धनगरवाडी , केशेगाव , इटकळ यासह अनेक तांडयास भेट देवुन बंजारा समाजातील प्रतिष्ठित, युवक, महिला, शेतमजूर यांच्याशी संवाद साधत बंजारा समाजास आरक्षण मिळावे याकरिता सोमवार दि.२९ सप्टेंबर २०२५ रोजी धाराशिव येथे आयोजित महामोर्चाबाबत माहिती देत जनजागृती करण्यात आली.
माजी जि.प. सदस्य प्रकाश चव्हाण, तांडा सुधार समितीचे अशासकिय सदस्य विलास राठोड, निवृत्त अन्न सुरक्षा अधिकारी शंकर राठोड, रवी महाराज राठोड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक हरिष जाधव, निवृत्त मुख्याध्यापक शिवाजी राठोड, अशासकीय सदस्य वसंत पवार, दामाजी राठोड, लक्ष्मण राठोड, माजी सरपंच बालाजी राठोड, धाराशिव गोरसेना जिल्हा उपाध्यक्ष राजू चव्हाण आदींसह अनेकजण सहभागी होवुन जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतले आहे.