विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडून
पालकमंत्र्यांची रस्तेकामांना स्थगिती

मुख्यमंत्र्‍यांकडे मागितली दाद, लवकरच कामे सुरू होणारः भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी

धाराशिव,दि.३०:
जिल्ह्यातील अपप्रवृत्तीच्या विरोधकांनी दिलेल्या चुकीच्या माहितीला गृहीत धरून पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री श्री. एकनाथ शिंदे सांहेबांकरवी धाराशिव शहरातील ५९ रस्ते आणि नालीच्या कामावर स्थगिती आणली आहे. ही बाब अत्यंत खेदजनक आहे. याबाबत आम्ही मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली आहे. यावर लवकरच तोडगा निघेल आणि कामे सुरू होतील, असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे. 

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नांमुळेच नगरोत्थान योजनेतून या कामासाठी ११७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

धाराशिव शहरातील ५९ रस्ते आणि नाल्यांची कामे करण्यासाठी मित्रचे उपाध्यक्ष, आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून ११७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करवून घेतला. हे काम सुरू झाले तर आपली अकार्यक्षमता लोकांसमोर येईल, या भीतीने काही अपप्रवृत्तीच्या राजकीय विरोधकांनी या कोमात खोडा घातला. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पत्राचा आधार घेऊन उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेबांनी दूरध्वनीद्वारे या कामांना स्थगिती दिली. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, अशी भावना भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी व्यक्त केली. 

धाराशिव शहरातील रस्त्यांची गेल्या अनेकत महिन्यांपासून दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांचा हा त्रास कमी करण्यासाठी आमदार राणाजगजतिसिंह पाटील साहेब यांनी प्रयत्न केले. त्यामुळे नगरोत्थान योजनेतून ५९ रस्ते आणि नालींच्या कामासाठी ११७ कोटी रुपये मंजूर झाले. निधी मंजूर झाला, आता कामे सुरू झाली तर आपली अकार्यक्षमता जनतेसमोर येईल, या भीतीने जिल्ह्यातील अपप्रवृत्तीच्या विरोधकांनी वेगवेगळ्या पद्धतीने या कामात आडकाठी आणण्याचे प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी विविध हातखंडे वापरत हा विषय अनेक महिने प्रलंबित ठेवला. 

मात्र आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी रस्त्यांच्या कामाचा विषय लावून धरला आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आले. त्यानुसार धाराशिव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांनी १६ ऑक्टोबर २०२५ रोजी कार्यारंभ आदेश जारी केले होते. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी या कामांना प्रत्यक्ष प्रारंभ देखील झाला. मात्र, त्याच दिवशी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पत्राच्या आधारावर उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दूरध्वनीद्वारे या कामांना स्थगिती दिली. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे, असेही दत्ता कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

धाराशिव शहरात जवळपास सर्वच रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली आहे. या खराब रस्त्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील हजारो नागरिकांना मणक्याचे आजार झाले आहेत. अबालवृद्ध व माता भगिनींना प्रवास करणे असह्य झाले आहे. अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.

जिल्ह्याचे पालकत्व ज्यांच्याकडे आहे त्या पालकमंत्र्यांनीच राजकीय अपप्रवृत्तींनी या कामाच खोडा घालण्यासाठी जाणीवपूर्वक चुकीची माहिती दिली. ती माहिती गृहीत धरून शहराच्या विकासकामांवर स्थगिती आणणे हे अत्यंत खेदजनक आहे. धाराशिव शहरातील जनतेच्या हिताचा विचार करून नगरोत्थान योजनेतील रस्ते व नाली कामांवरील स्थगिती त्वरित उठवण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे दाद मागितली आहे. यावर लवकर तोडगा निघेल आणि कामे सुरू होतील, असा विश्वास दत्ता कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे.

 
Top