उस्मानाबाद -: एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमात लोकांचा सहभाग वाढून कामास गती देण्यासाठी व्यापक जनजागृती अभियान उस्मानाबाद तालुक्यात 6 डिसेंबरपर्यंत राबविण्यात येत आहे. कुमाळवाडी, किनी, येडशी व कौडगाव येथे या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
कुमाळवाडी येथील कार्यक्रमास कृषि महाविद्यालयाचे डॉ. व्ही. एस. जगताप, मंडळ कृषी अधिकारी ए. पी. चिक्षे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना, केशेगावचे संचालक विश्वनाथ खोत, कृषि पर्यवेक्षक बी. व्ही. पाटील, एन. ए. गिरी आदिंची उपस्थिती होती.
कौडगाव येथे तालुका कृषि अधिकारी एस. पी. जाधव, जिल्हा समन्वयक पाणी पुरवठा व स्वच्छता अभियान रमाकांत गायकवाड, श्री. चिक्षे मंडळ, कृषी पर्यवेक्षक बी. व्ही. पाटील यांच्या उपस्थितीत कायर्के्रम घेण्यात आला.
कुमाळवाडीच्या अभियानात चिक्षे यांनी प्रास्ताविकात एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमाचे महत्व सांगून हा कार्यक्रम लोकसहभागातून गावातील पाणलोट समितीमार्फत राबविण्याचा सल्ला दिला. डॉ. जगताप यांनी पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी पिकास आच्छादन करुन लागवड करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कौडगाव येथे तालुका कृषी अधिकारी जाधव यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले. सर्व गांव हागणदारीमुक्त करण्यासाठी सर्व नागरीकांचे प्रबोधन गायकवाड यांनी केले.
किनी व येडशी येथेही जनजागृती अभियानाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी इंगळे, मगर, घोगरे, भूतेकर, गोरे, चव्हाण, रोडे यांनी विशेष परिश्रम घेतले. या अभियानास शेतक-यानी उत्सफुर्त प्रतिसाद दिला.