उमरगा (सुनिल पवार) -: देशाच्‍या स्‍वातंत्र्य चळवळीत व आजतागायत समाजाच्‍या जडणघडणीमध्‍ये वृत्‍तपत्राने मोठे योगदान दिले असून आजही सामाजिक न्‍यायाला अधिक विस्‍तारित करण्‍याच्‍या दृष्‍टीने व लोकशाही व्‍यवस्‍था अधिक सक्षम बनविण्‍यासाठी वृत्‍तपत्राची भूमिका महत्‍त्‍वपूर्ण आहे, असे मत ज्ञानकिरण सामाजिक संस्‍थेचे संस्‍थापक भैरवनाथ कानडे यांनी व्‍यक्‍त केले.
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद व बलसूर (ता. उमरगा) येथील भाऊसाहेब बिराजदार वरिष्‍ठ महाविद्यालयाच्‍यावतीने लोहारा तालुक्‍यातील होळी येथे पर्यावरण संवर्धनासाठी युवक-युवतींचे आयोजित राष्‍ट्रीय सेवा योजना शिबिराप्रसंगी लोकशाहीतील पत्रकारितेचे स्‍थान या विषयावर प्रमुख वक्‍ते म्‍हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी महात्‍मा गांधी विद्यालयाचे संस्‍थापक गोविंद गायकवाड हे होते. तर प्रमुख पाहुणे म्‍हणून होळीचे विद्यमान सरपंच दत्‍ता गायकवाड यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना पर्यावरण संवर्धनाच्‍या संबंधाने आज युवकांनी पुढाकार घेऊन पर्यावरण संतुलनासाठी सक्रीय राहणे गरजेचे असल्‍याचेही यावेळी कानडे यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्रा. जे.एम. वाघमारे यांनी केले. यावेळी सहशिक्षक बी.व्‍ही. शिंदे, मुख्‍याध्‍यापक एम.बी. गायकवाड, बी.एम. गायकवाड, बिराजदार, जाधव, आदीसह महाविद्यालयातील प्राध्‍यापक, विद्यार्थी व ग्रामस्‍थ उपस्थित होते.
 
Top