उस्मानाबाद -:  पाऊस पाणी संकलन आणि त्याचे उत्तम व्यवस्थापन केले तर आपण पाणीटंचाईचा यशस्वी मुकाबला करु शकतो. त्यासाठी शासन यंत्रणांबरोबरच लोकसहभागाची आणि लोक पुढाकाराची आवश्यकता आहे,असे प्रतिपादन चेन्नई येथील रेनसेंटर या संस्थेचे संचालक डॉ. सेखर राघवन यांनी केले.
     जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन यांच्यावतीने आज जिल्ह्यातील जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती,सदस्य, गटविकास अधिकारी यांच्यासाठी पाऊस पाणी संकलन आणि पाणी पुनर्भरण व पुनर्वापर या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. राघवन बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, उस्मानाबादच्या पंचायत समिती सभापती प्रेमलता लोखंडे, जिल्हाधिकारी डॉ. के.एम. नागरगोजे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. हरिदास आदिंची व्यासपीठावर उपस्थिती होती.
      आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ. राघवन यांनी  पाऊस पाणी संकलनाबाबत चेन्नई येथे झालेल्या प्रयत्नांची  माहिती दिली. तामिळनाडू सरकारने पाऊस पाणी संकलन प्रत्येक इमारतीसाठी बंधनकारक केले असून त्याचा सकारात्मक  परिणाम झाल्याचे सांगितले. चेन्नई येथे पावसाचे प्रमाण जास्त असले तरी ते साठवण्याची व्यवस्था नसल्याने ते पाणी वाया जात होते. यासंदर्भात रेन सेंटर या संस्थेंच्या माधयमातून  पाऊस पाणी संकलनाबाबत जनजागृती करण्यात आली. लोकांचा सहभाग मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले. शासनानेही ही बाब बंधनकारक केल्याने शहरात पाणी संकलन उत्तम पध्दतीने होऊ लागले. यामुळे चेन्नई शहरातील भूजल पातळीत वाढ होवून त्याचा फायदा शहराला झाला. त्यामुळे शहराला आता टंचाई सारख्या परिस्थितीला वारंवार सामोरे जावे लागत नाही.
      पाऊस पाणी संकलनामुळे स्वयंपुर्ण् झाल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांव्दारे होणाऱ्या  पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत नाही, असेही त्यांनी नमूद केले.
     पाणी व्यवस्थापनामध्ये पाऊस पाणी संकलन हा सर्वात महत्वाचा घटक आहे. कारण कोणत्याही पाणी साठवणूकीचा पाऊस हाच महत्वाचा स्त्रोत असल्याचे सांगून डॉ. राघवन म्हणाले की, वापरलेले पाणी पुन्हा उपयोगात आणणेही तितकेच महत्वाचे आहे. त्यासाठी लोकांमध्ये जनजागृती, त्यांना त्यासाठी मदतीचा हात आणि विविध सर्व्हेक्षण आणि अभ्यासाच्या माध्यमातून पाण्याचे महत्व पटवून देणे गरजेचे आहे.
      पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत पावसाचे पाणी हाच आहे. आपल्याला अनेक ठिकाणी पावसाळ्यात पूरस्थिती आणि उन्हाळ्यात दुष्काळाचा सामना करावा लागतो. पाण्याचा अनिर्बंध वापर आणि पाणी आपल्यासाठीच उपलब्ध आहे ही मानसिकता दुष्काळाला कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले.  
         यावेळी त्यांनी चेन्नई येथे पाणी संकलनासाठी असलेल्या इतिहासकालीन एरी (नदीच्या आसपासच्या परिसरात असणारे तलाव एरी म्हणून संबोधले जातात) या प्रकाराचीही माहिती दिली. डॉ. व्हट्टे यांनी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त असल्याचे सांगितले.
      जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांनी या कार्यशाळा आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. पाण्याच्या टंचाईमुळे पाणी व्यवस्थापनाला महत्व आले आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब साठविणे गरजेचे आहे. याशिवाय शेतीमध्ये वापरण्यात येणाऱ्या रासायनिक खतांमुळे पाणी दुषित होत आहे याकडेही लक्ष दिले पाहिजे,असे आवाहन त्यांनी केले.
       टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते गणेश चादरे यांनी दुष्काळ निर्मूलनात लोकसहभागाचे महत्व पटवून दिले. भूजल सर्व्हेक्षण विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक प्रमोद रेड्डी यांनी जिल्ह्यात भूजल सर्व्हेक्षण विभागामार्फत पाणीपुरवठा स्त्रोत बळकटीकरणासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. जि.प. च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.तांगडे यांनी सुत्रसंचालन केले व आभार मानले.
 
Top