उस्‍मानाबाद -: परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठास हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचे नाव द्यावे, याकरीता औरंगाबाद विभागीय आयुक्‍त कार्यालयावर शुक्रवार दि. 31 मे रोजी महाराष्‍ट्र गोर बंजारा सेवा संघ व भारीप बहुजन महासंघासह विविध संघटनेच्‍यावतीने भव्‍य मोर्चाचे आयोजन करण्‍यात आले आहे.
    शुक्रवार दि. 31 मे रोजी दुपारी बारा वाजता भडकल गेट, औरंगाबाद येथून मोर्चा निघणार असून या मोर्चाचे नेतृत्‍व भारीप बहुजन महासंघाचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर उर्फ प्रकाश आंबेडकर हे करणार आहेत. प्रारंभी भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चास प्रांरभ होईल. हा मोर्चा विभागीय कार्यालयावर जाऊन विभागीय आयुक्‍तांना निवेदन देण्‍यात येणार आहे. या मोर्चाचे जाहीर सभेत रुपांतर होणार आहे. या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी महाराष्‍ट्र गोर बंजारा सेवा संघाचे अध्‍यक्ष हिरासिंग राठोड हे राहणार आहेत. तर भारतीय आदीवासी भटके विमुक्‍तचे संस्‍थापक अध्‍यक्ष मोतीराज राठोड, गोर बंजारा समाजाचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष दिगंबर राठोड, बंजारा क्रांती दल नांदेडचे संस्‍थापक अध्‍यक्ष देविदास राठोड, कामगार व शेतमजुर बचाव कृती समिती नांदेडचे अध्‍यक्ष रामराव महाराज भाटेगावकर, वसंतराव नाईक संघर्ष सेना परभणीचे अध्‍यक्ष सतिश जाधव, वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटना अकोलाचे अध्‍यक्ष अमर राठोड, बंजारा भटके विमुक्‍त आदिवासी संघटना औरंगाबादचे संस्‍थापक अध्‍यक्ष चुन्‍नीलाल जाधव, राष्‍ट्रीय बंजारा कृषी परिषद पुणेचे समन्‍वयक किसनराव राठोड, भारतीय आसरा लोकमंच महाराष्‍ट्र राज्‍य युवा, औरंगाबादचे अध्‍यक्ष गुलाब जीतराम जाधव आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी या मोर्चात सर्वांनी सहभागी व्‍हावे, असे आवाहन भारीप बहुजन महासंघ उस्‍मानाबादचे मिलींद रोकडे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
 
Top