उस्मानाबाद -: राज्याच्या ग्रामीण भागातील गरीबांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांच्या आयुष्यात उपजीविकेसाठीच्या प्रयत्नांतील आशादायी उपक्रमांचा शोध आता घेतला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जागतिक बॅंकेच्या सहकार्याने राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती प्रकल्प राबविण्यात येत असून त्याअंतर्गंत या नवोपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील जीवनमान विकसित करण्यासाठी खाजगी, शासकीय, अशासकीय, सहकारी संस्था, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक व संशोधन संस्था आदींमार्फत अशा प्रकारचे नवोपक्रम 15 मेपर्यंत पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
     सध्याची वस्तू वा सेवा, प्रक्रिया,, परिस्थितीयांच्याहून भिन्न आणि चाकोरीबाहेरचा असा हा उपक्रम असणे आवश्यक आहे. सामाजिक उद्योजकतेसाठी वातावरण तयार करणे तसेच उपजीविका निर्मितीसाठी नव्या, मापता येणाऱ्या टिकाऊ आणि मोठ्या प्रमाणावर करता येण्यासारख्या उपक्रमांना उत्तेजन देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट्य आहे.
     कामातील नावीन्य व वेगळेपण, गरीबांच्या उपजीविकेवर होणारा सकारात्मक परिणाम, महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अपंग आदी दुर्बल घटकांपर्यंत पोहोचणारा,  सामाजिक संसाधनांचा चांगल्या प्रकारे आणि सध्याच्या सामाजिक परिस्थितीशी  सुसंगत अशा प्रकारचा उपक्रम सुचविणे आवश्यक आहे. याशिवाय परिस्थितीत त्यामुळे होणारे मूलगामी बदल, वेगवेगळ्या भौगोलिक आणि सामाजिक, आर्थिक परिस्थितीच्या अनुषंगाने योग्य ते बदल करुन उपक्रम राबिता येण्याची क्षमता, उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविता येण्याची क्षमता, टिकाऊपणा, पर्यावरणावर होणार सकारात्मक परिणाम आणि मोठ्या प्रमाणावर प्रभाव पाडण्याची क्षमता हे मूल्यमापनाचे निकष असणार आहेत.
      सामाजिक सहभाग, आर्थिक सहभाग, उपजीविका, तांत्रिक नवोपक्रम, माध्यमे व संपर्क यंत्रणा, सार्वजनिक क्षेत्रातील नवोपक्रम, सामाजिक उद्योजकता व समावेशक व्यवसायिक प्रारुपे अशा प्रवर्गात संबंधितांना आपले नवोपक्रम सादर करता येणार आहेत.
      या नवोपक्रम उपक्रमासाठी करावयाचा अर्ज www.msrlm.org/mrlif या संकेतस्थळावर तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उस्मानाबाद येथे उपलब्ध असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत हजारे आणि प्रकल्प संचालक डॅा. केशव सांगळे यांनी कळविले आहे. संबंधितांनी आपले अर्ज mrlif@msrln.org या ई-मेल पत्त्यावर तर हार्ड कॉपी विहित दस्ताऐवजासह महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती नवोपक्रम मंच, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, 101-102, मोनार्च प्लाझा, प्लॅाट नं.56, सेक्टर 11, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-400614 या पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संबंधितांना आपला अर्ज फक्त मराठी वा इंग्रजीतच करता येईल.यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही.
      सर्वोत्तम नवोपक्रमांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार असून पहिल्या क्रमांकास रुपये 5 लाख, द्वितीय 3 लाख, तृतीय क्रमांकास 2 लाख व सर्वांना प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन गौरविले जाणार आहे. याशिवाय प्रत्येक प्रवर्गातील उत्तम नवोपक्रमास रुपये 1 लाख, प्रमाणपत्र व मानचिन्ह आणि परीक्षकांनी निवडलेल्या तीन नवोपक्रमांनाही रुपये 1 लाख, प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल. अंतीम फेरीत पोहोचणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.  अधिक माहितीसाठी प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जुनी जिल्हा परिषद इमारत, उस्मानाबाद येथे संपर्क साधण्याचे आवाहन डॉ.. सांगळे यांनी केले आहे.
 
Top