उमरगा (लक्ष्‍मण पवार) -: अनेक समाज आरक्षण मागतात मग वीरशैव समाजाला आरक्षण का नाही, यासाठी समाज बांधवानी आंदोलन करण्‍याची गरज निर्माण झाली असून गेल्‍या साठ वर्षात या समाजाच्‍या मागण्‍याकडे शासनाने दुर्लक्षच केले असल्‍याचे मत मेळाव्‍याचे संयोजक प्रा. सुदर्शन बिराजदार यांनी व्‍यक्‍त केले.
    लातूर येथे दि. 30 नोंव्हेबर रोजी होत असलेल्या महाबसव मेळाव्याच्या जनजागृतीनिमित्त शनिवार रोजी उमरगा तालुक्यातील बेटजवळगा, एकुरगा, तुरोरी, गुंजोटी, खसगी, जकेकूर, दाळिंब, येणेगूर, कोथळी, आलूर आदी गावात प्रा. बिराजदार यांच्‍या सभा झाल्‍या. यावेळी औसा हिरेमठ संस्थानचे शांतवीरलिंग शिवाचार्य महाराज, वीरशैव समाजाचे अध्यक्ष डॉ. मल्लिनाथ मलंग आदींची उपस्थिती होती
     यावेळी शिवाचार्य महाराज म्हणाले की, लातूर ही राज्‍यातील वीरशैव समाजाची राजधानी मानली जाते. प्रत्‍येक धर्मात मागण्‍या मागण्‍याचे अधिकार आहेत. हा समाज कधी संघर्ष वा आंदोलन करत नाही, यामुळे शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे या प्रश्‍नाकडे शासन लक्ष देत नाही. या समाजानी मुळ गावात एकजुट निर्माण करावी व गावातील गोरगरीब विद्यार्थ्‍यांना मदतीचा हात पुढे करावा. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
    संयोजक प्रा. सुदर्शन बिराजदार म्हणाले की, राज्यात मराठा समाज आरक्षण मागतो मग आपण का मागू नये, गेल्या बसव मेळाव्यानंतर दोन दिवसांनी मंत्रालयात तातडीची बैठक घेऊन मागण्याबाबत चर्चा झाली होती. मंगळवेढा येथे महात्‍मा बसवेश्‍वराचे राष्ट्रीय स्‍मारक मंजुर झाले होते. यासह अनेक मागण्या प्रलंबित राहिल्याने हा मेळावा होत आहे. आगामी काळातील समाजाच्‍या प्रश्‍नासाठी शासन दरबारी प्रयत्‍न करु असे आश्‍वासन देऊन या मेळाव्‍यानंतर शक्‍ती प्रदर्शन पाहुन शासनाला जाग येईल व मागण्‍या मंजुर होतील, यासाठी सर्वांनी प्रयत्‍न करण्‍याचे आवाहन यावेळी प्रा. बिराजदार यांनी केले.
    यावेळी वैजीनाथ माशाळकर, विजय पाटील, सुभाष जेवळे, सुभाष गिरीबा, काशिनाथ मुत्ते, शरणाप्‍पा येळापूरे, काशिनाथ मुत्‍ते, अशोक खसगे, दाळींबचे सरपंच सुरेश वाले, सुरेश वाले, महेश लिंबाळे, प्रकाश स्वामी, भिमाशंकर कस्‍तुरे, शंकर पाटील, सागर उटगे, कल्‍लेश्‍वर कोट्टरगे, जकेकुरचे सरपंच राजेंद्र समाने आदीजण उपस्थित होते.

उस्‍मानाबाद जिल्‍ह्यात पाच जणांचा समाजभूषण पुरस्‍कार जाहीर
    जिल्‍ह्यात वीरशैव समाजासाठी कार्य केल्‍याने उस्‍मानाबाद जि.प. अध्‍यक्ष डॉ. सुभाष व्‍हट्टे, वीरशैव संघाचे अध्‍यक्ष डॉ. मल्लिनाथ मलंग, पत्रकार सुभाष जेवळे, वैजिनाथ माशाळकर, शिवानंद कथले यांना समाजभूषण पुरस्‍कार जाहीर झाले आहे.
 
Top