उस्मानाबाद :- आपल्या जिल्ह्यातील वनक्षेत्र चार वर्षांपूर्वी अत्यंत कमी होते, आता यावर्षी चार चौरस किलोमीटर वनक्षेत्रात वाढ झाली आहे. शासनाने 13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्याला 28 लाखाचे उद्दिष्ट दिले होते,त्याला प्रतिसाद देताना शासनाच्या विविध विभागांनी, विविध शाळांनी, महाविद्यालयांनी, सामाजिक संस्थांनी मिळून आतापर्यंत 42 लाख वृक्षारोपण करून इतिहास घडविला आहे आणि उस्मानाबादकरांच्या या जिद्दीला, सहकार्याला मी सलाम करतो, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी आज येथे काढले. 
तेजस सुपर स्ट्रक्चर प्रा. लिमिटेड, वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग आणि नागरिकांच्या एकत्रित सहकार्याने पोलीस अधीक्षक कार्यालय ते मध्यवर्ती प्रशासकीय इमारत या परिसरात एकूण चारशे वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, तेजस सुपर कन्स्ट्रक्शन चे कार्यकारी संचालक आप्पा सुरळकर, प्रसिद्ध डॉक्टर भारत माने, डॉक्टर अभय शहापूरकर, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, विभागीय वनाधिकारी राजेश्वर सातेलीकर, सामाजिक वनीकरण विभागीय वनाधिकारी श्री.बेडके, माजी सरकारी वकील ॲड.विजयराव शिंदे, रा.प.महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.जयसिंग देशमुख, नगरपालिका मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे हे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गमे पुढे म्हणाले, उस्मानाबाद जिल्ह्यातील वनक्षेत्र अत्यंत कमी होते मात्र गावठाण व पडीक जमिनींवर वृक्षारोपण करण्याच्या महत्त्वाच्या निर्णयामुळे आज या जिल्ह्यातील वनक्षेत्र वाढले आहे. महाराष्ट्रात फक्त तीनच जिल्ह्यांचे वनक्षेत्र वाढले आहे त्यात उस्मानाबादचाही समावेश आहे, ही बाब आपल्यासाठी निश्चितच अभिमानास्पद आहे. याबरोबरच जलयुक्त शिवारच्या कामातही उस्मानाबाद जिल्हा महाराष्ट्रात अव्वल क्रमांकावर आहे. एकूणच जिल्ह्यातील सर्व यंत्रणा वृक्ष आणि पाणी संवर्धनासाठी आणखी जोमाने कामाला लागल्यास जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्यास जास्त वेळ लागणार नाही. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी एकाच वेळी सर्व स्तरावर, सर्व यंत्रणांकडून, एकाच वेळी सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील. चांगले काम करणाऱ्यांना साथ देण्यात येईल. यासाठी भारतीय जैन संघटनांसारख्या इतरही काही सामाजिक संस्था, कंपन्या मदतीचा हात देण्यासाठी  सरसावले आहेत, असेही श्री. गमे यांनी सांगितले. 
यावेळी संजय निंबाळकर यांनी प्रास्ताविक करताना संस्थेच्या कार्याविषयी आणि उपक्रमांविषयी उपस्थितांना माहिती दिली. याप्रसंगी वृक्षारोपण व संवर्धन याकरिता स्वयंसेवक म्हणून उत्तम काम करण्याबाबत श्री.तुगावे यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ.संजय कोलते, डॉ.आबा सुरळकर, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. सतीश कदम यांनी केले, शेवटी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम करून कार्यक्रमाची सांगता झाली.



 
Top