नळदुर्ग :- भारतीय संविधानाने या देशातील प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा, बोलण्याचा, लिहण्याचा हक्क प्रदान केलेला असला तरी आजही अनेकांच्या नशिबी आठराविश्व दारिद्र्यामुळे उपासमारीची वेळ येत आहे. वास्तविकता या देशातील एकही नागरिक उपाशी झोपू नये यासाठी शासन सर्व स्तरावर नेहमीच प्रयत्न करीत असते. पण माणुसकी हरविलेल्या या जगात असे अनेक लोक आहेत की जे आजही उपाशी पोटी जीवन जगत आहेत. अशा उपाशी पोटी जीवन जगणाऱ्यात वेडसर पुरुष महिलांचा समावेश असलेले विदारक दृष्य आपण उघड्या डोळ्यांनी पहातोय. आणि मला काय त्याचे समजून प्रसंग दुर्लक्षित करतोत
         आज प्रत्येक जण मग तो राजकारणी असो की सामाजिक कार्यकर्ता वेगवेगळ्या विषयावर आंदोलने करताना आपण नेहमीच पहातो. पण अशा उपाशीपोटी झोपणाऱ्या विशेषतः भिकाऱ्याच्या प्रश्नावर आंदोलने होताना कुठे पहायला मिळत नाहीत. त्यामुळे समाजातील संवेदनशीलता कुठेतरी संपली की काय असा प्रश्न मनात नेहमीच सतावतोय
        भारतीय संविधानाने अशा लोकांनाही सन्मानाने जगण्यासाठी पर्याय निर्माण करून दिलाय. पण त्यासाठी हवी समाजाची जागरूकता अन संवेदनशीलता
         आजकाल आपल्या अवती भोवती असे अनेक भिकारी आपणास पहावयास मिळतात. अशा भिकाऱ्यानाही सन्मानाने जगणे मिळवून आपण देऊ शकतो त्यासाठी गरज आहे ती आपल्या प्रयत्नाची. गावोगावी दिसणारे हे भिकारी कधीकधी त्रासदायकही ठरतात. अशा लोकांकडून एखादी अघटित घटना सुध्दा घडू शकते आणि त्या नंतर उदभवलेली परिस्थिती मात्र नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. कायदा सुव्यवस्थेवर त्याचा खूप मोठा परिणाम होऊ शकतो
      आपल्या गावातील कायदा सुव्यवस्था बिघडू नये या साठी सर्वांचे प्रयत्न मोलाचे असतात. याच जाणिवेतून आपल्या परिसरात दिसणारे सर्व भिकारी जरी त्रासदायक वाटत नसले तरी त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी नजीकच्या पोलिसांकडे त्यांना सुपूर्त करा जेणे करून गावात भिकारीही राहणार नाहीत अन अघटित घटनाही घडणार नाहीत. अशा वेळी जर कोणता पोलीस अधिकारी आपण घेऊन गेलेल्या भिकाऱ्यास ताब्यात घेण्यास नकार देत असेल किंवा तो टाळाटाळ करीत असेल तर त्याची रीतसर तक्रार त्यांच्या वरिष्ठांकडे करा.  विशेष म्हणजे आपल्या या कृत्याने त्यांना त्यांच्या जगण्याचा हक्कही मिळेल. आणि आपणास एक सामाजिक कर्तव्य पार पडल्याचा आनंदही.  त्यासाठी फक्त हवे आहे ते आपले मन समाजाप्रती काही भावना.

*सुनील बनसोडे*
पत्रकार


 
Top