उस्मानाबाद :- जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या पाल्याची शैक्षणिक जवाबदारी मुंबई येथील सिध्दीविनायक ट्रस्टच्या वतीने घेण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैâलास पाटील यांनी दिली.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या या उस्मानाबाद जिल्ह्यातील आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्यासंदर्भात जिल्हा शिवसेनेच्या वतीने माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाप्रमुख कैलास पाटील, उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या वतीने शिवसेना सचिव तथा सिध्दीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांची मुबंई येथे भेट घेवून यासंदर्भात विनंती केली होती. या विनंतीची दखल घेत जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील पाल्यांच्या प्राथमिक ते पदव्युत्तर शिक्षणाची जवाबदारी सिध्दीविनायक ट्रस्टच्या वतीने घेण्यात येणार असल्याची माहिती बांदेकर यांनी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिका-यांना दिली.
सिध्दीविनायक ट्रस्टच्या वतीने घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील अनेक आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील पाल्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने शिवसेना सचिव तथा सिध्दीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.