ज्ञानसूर्य, भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतातील सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचे प्रवर्तक, लोकशाहीचे पुरस्कर्ते, जगाला मानवतेचा संदेश देणारे, थोर विचारवंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कायदा, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र, संस्कृतचे गाढे अभ्यासक,धर्मशास्त्र, इतिहास इत्यादी विषयाचे प्रकांड पंडित होत. त्याबरोबरच समाजकारण, राजकारण, अर्थकारण, निर्भीड पत्रकारिता या क्षेत्रातही त्यांचे विचार आणि कर्तृत्व अफाट आहे.

      डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते.  कोटी कोटी अस्पृश्य दलितांना मानवी हक्कांची जाणीव करून देणारे होते. दीनदलित,शोषित, पिडित, शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला आणि बहुजन वर्गाचे प्रेरणास्थान व तारणहार होते.  मानव, समाज, देश, धर्म, संस्कृती या विषयाच्या अनुषंगाने सामान्य माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार राजकीय समानता, स्वातंत्र्य बंधुता व समाज सुधारणेच्या दृष्टिकोनातून आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत भारतातील मानवी जीवनाचे कल्याण लक्षात ठेवून सातत्याने प्रामाणिकपणे प्रयत्न केले. तसेच तत्कालीन समाजाला व देशाला भेडसावणाऱ्या ज्वलंत समस्या उभ्या होत्या त्या समस्यांच्या मुळाशी जाऊन चिकित्साही केली. मग त्या समस्या आर्थिक, राजकीय किंवा शैक्षणिक असो यांचा सर्वांगीण विकास कसा करता येईल याविषयी त्यांनी वेळोवेळी आपले विचार आणि भूमिका 'मूकनायक'  'बहिष्कृत भारत' जनता आणि 'प्रबुद्ध भारत' यासारख्या नियतकालिकांमधून, पाक्षिकामधून, भाषणातून व पुस्तकातून विशद केली.

      डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आता केवळ एका जातीचे धर्माचे वंशाचे महापुरुष राहिलेले नाहीत तर ते अखिल विश्वाचे महापुरुष आहेत हे राष्ट्र अखंड राहावे यासाठी त्यांनी भारताचे धर्मनिरपेक्ष सार्वभौम संविधान लिहिताना त्यांनी बुद्धाच्या तत्वज्ञानातून समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय हे तत्वज्ञान घेतलेलं आहे. डॉ.बाबासाहेबांचे विचार काळाच्या दृष्टीने मूलगामी होते त्याप्रमाणे ते स्वच्छ व पारदर्शक होते. बुद्धिमत्तेचे विलक्षण तेज तळपत असतानाही नम्रता, स्वाभिमान आणि प्रामाणिकतेचा त्रिवेणी संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतो. विविध पातळीवर अविरत संघर्ष करणाऱ्या डॉ.बाबासाहेबांचे जीवनकार्य व त्यांनी दिलेला संदेश नव्या पिढीने अंतःकरणपूर्वक समजून घ्यायला हवे. थोर माणसं जन्माला येत नसतं तर प्रतिकूल परिस्थितीशी झगडून काळाला वेसण घालण्याचे काम करतो तेव्हा तो मोठा व्यक्ती ठरत असतो आणि नेमकं हे त्यांच्याप्रती दिसून आलं त्यामुळे ते क्रियाशील नेता,अर्थतज्ञ, कायदेपंडित, घटनाकार व दलित साहित्याचे प्रेरणास्रोत म्हणून समोर येतात. "जी जात नाही ती जात" अशी मानसिकता ज्या समाजात घट्ट रुतून बसली आहे अशा त्या व्यवस्थेला समूळ नष्ट करून स्वातंत्र्य, समता व बंधुता यावर आधारीत नवीन समाज रचना निर्माण करणे हे त्यांचे ध्येयं होते. या ध्येयासाठी त्यांनी अपार कष्ट केले. मानापमान,हाल अपेष्टा सारंसहन केलं पण आत्मविश्वास, परिश्रम आणि जिद्द कायम ठेवून आपली विचार चळवळ पुढे नेली.  या चळवळीच्या माध्यमातून उदयास आलेल व्यक्तित्व हे विचारी माणसाला केवळ स्तिमितच करत नाही तर अंतर्मुख करायला भाग पाडणार आहे.

       डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा साहित्यापलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा होता की साहित्य समाज परिवर्तनाचे एक प्रभावी माध्यम आहे. उदात्‍त जीवनमूल्ये व सांस्कृतीक जीवनमूल्ये आपल्या साहित्य प्रकारातून अविष्कृत करावे, आपले लक्ष आकुंचित व मर्यादित ठेवू नये व ते विशाल बनवावे.आपली वाणी चार भिंतीपुरती राखून न ठेवता तिचा विस्तार होऊ द्यावा. आपली लेखणी आपल्या प्रश्नापुरतीच बंदिस्त करु नका तर लेखणीचे तेज खेड्यापाड्यातील अंधार दूर करील असे प्रवर्तित करा असे बाबासाहेब म्हणायचे. आपल्या देशात उपेक्षितांच, दलितांच फार मोठे जग आहे हे विसरु नका त्यांचं दुःख, त्यांच्या व्यथा नीट समजून घ्या आणि आपल्या साहित्याद्वारे त्यांचे जीवन उन्नत करण्यासाठी प्रयत्नशील रहा त्यातच खरी मानवता आहे. डॉ. बाबासाहेबांनी लेखकांना केलेला हा महान् उपदेश प्रत्येक लेखकाने आपल्या संवेदनशील काळजावर कोरून ठेवून आपली दृष्टी,वाणी,  लेखणी विशाल बनवावी आणि उपेक्षित व दलितांचे जीवन आपल्या साहित्याद्वारे उन्नत करावे हेच साहित्याचे प्रयोजन आहे. सर्व प्रकारच्या विषमता दूर करण्यासाठी आणि सामाजिक लोकशाही प्राप्त करून घेण्यासाठी शिक्षण हा एक राजमार्ग आहे.आंबेडकरांना शिक्षणाचे  अतिशय वेड होते. शिक्षणामुळे आपल्या व्यक्तिमत्त्व विकास होऊ शकतो. आपल्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीत बदल होऊ शकतो हा विचार त्यांनी मांडला. केवळ साक्षरतेसाठी शिक्षण न घेता सर्वांगीण विकास कसा साधता येईल हा विचार मनात ठेवावा अन् "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते प्राशन केल्याने माणूस डरकाळी फोडल्या शिवाय राहणार नाही" व शिक्षण हे लोकजागृतीचे शस्त्र होय शिक्षणाशिवाय अधिकारपदे मिळू शकत नाहीत जोपर्यंत अधिकारपदे प्राप्त होत नाही तोपर्यंत आपल्या हातात खरी सत्ता आलेली नाही असे म्हणावे लागेल. आपल्या अशिक्षित बांधवांची सेवा करणे हे सुशिक्षित बांधवांचे प्रथम कर्तव्य आहे. मुलींना शिक्षण द्यायला पाहिजे. "ज्ञान आणि शिक्षण" हे केवळ पुरुषांसाठी नसून महिलांसाठीही आवश्यक आहे. असे सकारात्मक विचार त्यांच्या मनात नेहमी असायचे.

     डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्वज्ञान बुद्धिप्रामाण्यवादी वैज्ञानिक आणि लोकशाही मूल्यांचा पुरस्कार करणारे आहे. त्यांनी धर्म, समाज संस्कृती याचे कठोर आणि तर्कशुद्ध चिकित्सा केली  व विषमता शोषण या जाणिवांना कडाडून विरोध केला तसेच समताधिष्ठित समाज रचनेची त्यांनी स्वप्न पाहिले. मानवी जीवनातील नैसर्गिक आणि स्वनिर्मित जीवनातील दुःख समजावून घेतले तर जीवनातील दुःख टाळता येतील मानवी जीवनात निर्माण होणाऱ्या दुःखाचे निर्मूलन करण्यासाठी प्रज्ञा, शील, करुणा, अष्टांगिक मार्ग व पारमिता यांचे महत्त्व त्यांनी प्रतिपादित केले. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, सुखी व आनंदी जीवन जगण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आपला उदरनिर्वाह झाला पाहिजे याकरिता मनुष्याची धडपड सतत असते परंतु मानवी जीवनात महापूर,भूकंप,साथीचे रोग, दुष्काळ, अपघात, आजारपण अशी निरनिराळी संकटे येतात व माणूस असुरक्षित बनतो. तेंव्हा अशा संकटकाळी जो मदत करतो तोच खरा माणूस होईल असेही बाबासाहेबांनी आपल्या विचारांतून सांगितले आहे.म्हणून माणसाने जात,धर्म ,पंथ असे सर्व भेद विसरुन सद्य परिस्थितीत कोरोनापासून अखिल मानव जातीचा बचाव करण्यासाठी घरी राहूनच एकत्रितपणे एकमेकांना मदत व सहकार्य केले पाहिजे.हीच खर्या अर्थाने डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या १२९ व्या जयंतीच्या निमित्ताने मानवंदना ठरेल असे वाटते.

- प्रा.सत्येंद्र राऊत           
 साहित्यिक व कवी 
 
Top