महात्मा बसवेश्वर बाराव्या शतकातील अद्वितीय व्यक्तित्व, सकल मानव जातीची अस्मिता, मानवी स्वातंत्र्याचा उद्घोष करणारे स्वातंत्र्यवीर, समतेचे उद्गाता, कुशल राजनीतिज्ञ, उत्तम प्रशासक, समाज क्रांती करणारे क्रांतीकारक, स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते, लोकशाहीचे प्रणेते, कृतिशील समाजसुधारक, विश्वविभूती, ऐतिहासिक महापुरुष व मानवी हक्क चळवळीचे प्रवर्तक तसेच समाजरचनेचे शिल्पकार होते. महात्मा बसवेश्वर यांना तत्कालीन विषम समाजव्यवस्था बदलून स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व सामाजिक न्यायाधिष्टीत समाजरचना उभी करायची म्हणून त्यांनी लिंगायत धर्माचा प्रचार व प्रसार केला.
बसवेश्वरांनी बालपणीच कन्नड व संस्कृत भाषा अवगत करून सर्व प्राचीन ग्रंथ तसेच धर्मशास्त्रांचा अभ्यास केला. ते चिकित्सक आणि विवेकवादी होते. प्रत्येक समाजसुधारणेची सुरुवात त्यांनी अगोदर स्वतःपासून व स्वतःच्या घरापासून केली. जात, वर्ण, लिंगभेद नाकारून त्यांनी मानव धर्माची शिकवण दिली. बसवेश्वरांचे विचार व कार्य उत्तुंग होते. ते विश्व क्रांतीचे व विश्व शांतीचे शांतिदूत आणि युगप्रवर्तक होते. नवसमाज निर्मिती हे त्यांचे स्वप्न होते. बहुजनांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी प्रौढ शिक्षणाची त्यांनी सुरुवात केली. लिंगायत धर्माच्या माध्यमातून वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था व स्त्रीदास्यत्व या विरोधात खूप मोठे बंड पुकारले आणि स्त्रियांमधील अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट करून शोषण थांबविले. स्त्रियांना सन्मान व प्रतिष्ठा मिळवून दिली व स्त्री अबला नसून सबला आहे असे त्यांनी म्हटले होते.
स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते असल्याने महात्मा बसवेश्वर मध्ययुगीन काळातील स्त्री मुक्ती चळवळीचे जनक होते. अनिष्ट रूढी, प्रथा व परंपरा मोडीत काढून भोंदूगिरी व चमत्कार करणाऱ्या बुवा बाबापासून समाजाला सावध करून अंधश्रद्धेवर प्रहार केला. त्यांनी कर्मकांडापेक्षा ज्ञानकांडाला अधिक महत्त्व दिले. ज्ञानाच्या माध्यमातून आचरण करणे हे त्यांचे तत्त्व होते.
महात्मा बसवेश्वरांच्या तत्त्वज्ञानात कायक सिद्धांत मूलभूत सिद्धांत होता. कायक म्हणजे स्वतःसाठी सत्य, शुद्ध व नित्य उदरनिर्वाहासाठी, समाज हितासाठी व समाज सेवेसाठी शरीर, मन व बुद्धीने व्यवसाय केला जातो तो कायक आहे. "कायकवे कैलास" हा जीवन सिध्दांत आहे. स्वतःसाठी जगत जगत थोडे समाजासाठी व इतरांसाठी जगणं म्हणजे दासोह होय. महात्मा बसवेश्वरांनी म्हटले आहे की जे फक्त स्वतःसाठी जगत असतात त्यांचा इतिहास कधी लिहिला जात नाही. जे इतरांसाठी व समाजसेवेसाठी जगत असतात ते मरण पावल्यानंतरही जगत असतात आणि तेच इतिहासाचे खरे नायक ठरतात. अतिरिक्त धनधान्य, पैसा, वेळ, श्रम व ज्ञान समाज सेवेसाठी खर्च केले पाहिजे. हीच खरी दासोह सेवा होय.
महात्मा बसवेश्वरांचे विचार जनजागृती व प्रबोधनासाठी अधिक बळ व प्रेरणा देणारे आहेत. नऊशे वर्षापूर्वी त्यांनी दिलेले विचार आज सकल मानवजातीच्या कल्याणासाठी आहेत. माणसा माणसांमध्ये उत्तम, मध्यम, कनिष्ठ म्हणून भेद केला तर मला वेदना होतात असे ते म्हणायचे. प्रत्येक व्यक्ती आमुचीच आहे त्यात भेदभाव करू नये आपल्या मुलांप्रमाणे इतर मुलांशी मानसन्मानाने वागावे. दया धर्माचा मूलमंत्र आहे. दयेशिवाय व दयेविना धर्म कोणता ॽ सकल मानव पशु-पक्षी व प्राणीमात्रावर दया, करुणा करणे हाच खरा धर्माचा मूलमंत्र आहे. बसवेश्वरांनी संपूर्ण मानव व प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी खूप संघर्ष केला. पशुपक्षी प्राणी व वृक्षांकडूनही प्रत्येक गोष्ट शिकण्यासारखी आहे. अज्ञानापोटी काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी विसंगत काम करीत असतात. विसंगती वाढल्याने काहींजण जिवंत नागाला एकीकडे काठीने मारतात तर दुसरीकडे दगडाच्या नागाची पूजा करतात, व्यक्ती किंवा प्राणी आला तर त्याला पुढे हो म्हणतात व भोजन न करणाऱ्या माणसाला आग्रहपूर्वक वाढतात. जिवंत गाईगुरांना चारापाणी न देता कसायाला विकतात आणि देवालयातील दगडाच्या बैलाला नैवद्य दाखवितात. आपल्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी देवाधर्माच्या नावाने कोंबडे, बकरे कापतात व प्राण्यांना उपाशी ठेवून काम करून घेतात आणि कितीतरी यातना देऊन अन्याय व अत्याचार करुन त्यांचा बळी देतात. कितीही विचित्र विसंगती ॽ ही विसंगती मोडीत काढण्याचा प्रयत्न महात्मा बसवेश्वरांनी केला तसेच सर्वच क्षेत्रात परिवर्तनाची सुरुवात करून शरणांचे संघटन उभारले व अनुभव मंटपाची स्थापना करुन वचनसाहित्य निर्माण करुन ते विचार समाज परिवर्तनासाठी मांडले. शरण म्हणजे सदाचार, सद्वृत्ती व सद्भावना आहे. शरण हा संस्कृती सूचक शब्द आहे. बसवेश्वरांचे वचन हे क्रांतिकारी व परिवर्तनवादी तसेच विवेकवादी साहित्य आहे. महात्मा बसवेश्वरांनी आपल्या वचनात म्हटले आहे -
करू नको चोरी, करू नको हत्या
करू नको क्रोध, बोलू नको मिथ्या
करू नको तिरस्कार, मारू नको बढाई
करू नको मत्सर, हीच अंतरंग शुद्धी
हीच बहिरंग शुद्धी,
हीच आमच्या कुडलसंगम देवाला प्रसन्न करण्याची रिती.
अशा प्रकारे सप्तशिलाचे आचरण करणे म्हणजे कुडलसंगम देवाला प्रसन्न करून घेण्यासारखे आहे. शरणांच्या सहवासात नतमस्तक होऊन आपलं मन शुद्ध , नितळ, पारदर्शी होऊन जातं एवढचं नव्हे तर निंदकसुद्धा आपल्याला देवासारखे वाटू लागतात. लिंगायत धर्मात सदाचार हा संस्कृतीचा पाया आहे. सदाचार स्वर्ग व दुराचार नरक आहे. प्रत्येकाने सदाचारी जीवन जगावे. जे सदाचारी आहेत त्यांना वेगळी भक्ती करण्याची आवश्यकता नाही. सदाचारी वृत्तीच सर्वश्रेष्ठ सेवा आहे. लिंगायत धर्मतत्वात सदाचारी व्यक्तिपेक्षा सर्वश्रेष्ठ कोणीच नाही. आपले शरीर व मन स्वच्छ, सुंदर ठेवा. देहरूपी देवालयास समजून घ्या. ज्ञानाच्या प्रभावाने अज्ञान दूर करा व चांगल्या विचाराने स्वतःमध्ये बदल करा, लोकंनिंदेला घाबरू नका, आपण काही दिले नाही तरी चालेल परंतु आपल्यामध्ये नम्रता असली पाहिजे.
महात्मा बसवेश्वर म्हणतात - माझ्याहून लहान कोणीच नाही, माझ्यासह आम्ही सर्वजण समान आहोत. कोणीही कोणापेक्षा मोठा नाही. स्त्री-पुरुष, श्रेष्ठ-कनिष्ठ, स्पृश्य-अस्पृश्य, धर्मभेद, जातीभेद, वर्णभेद बाळगू नका. कुणी स्तुती केली म्हणून फुगून जाऊ नये किंवा कुणी निंदा केली म्हणून खचून जाऊ नये. आईवडील हे आपले प्रथम गुरु आहेत म्हणून त्यांची सेवा करणे हेही आपले आद्य कर्त्तव्य आहे. आपणास जन्मतः मिळालेली अपार शक्ती व ज्ञान आपला गुरु असल्याने ती जागृत केल्यास आपणास खरा मार्ग सापडतो. "अरीवे गुरु" गुरु हे बसवेश्वरांनी सांगितलेले ज्ञानतत्त्व होते. कोण्या एका व्यक्तीला गुरु नसतो व सर्व ज्ञान एकाच गुरूकडून मिळत नसतं. निसर्ग आपला गुरु आहे. वृक्ष आपले गुरू आहेत. परोपकार सेवा हा अमूल्य गुण आपण त्यांच्याकडून शिकायला हवं.
महात्मा बसवेश्वर म्हणजे विश्वातील एक अद्वितीय प्रतिभा आहे. महात्मा बसवेश्वरांनी मांडलेले क्रांतिकारी वचन व विचार आज लोकापर्यंत गेले पाहिजेत म्हणून माणसाने जाती, धर्म, वर्ण, पंथ असे सर्व भेद विसरून सद्य परिस्थितीत कोरोनापासून अखिल मानवजातीचा बचाव करण्यासाठी आपण घरी राहून त्यांचे विचार आत्मसात करुन सर्वांना सहकार्य केले पाहिजे. हीच खर्या अर्थाने महात्मा बसवेश्वरांच्या जयंती निमित्ताने मानवंदना ठरेल. असे मला वाटते.
प्रा. सत्येंद्र संगाप्पा राऊत
साहित्यिक, लेखक व कवी
जवाहर महाविद्यालय अणदूर
मो. 738 739 4747