मुरूम, दि.४ :  कोरोनामुळे संपूर्ण राज्य अडचणीत आले असताना दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे.या कोरोनाच्या संकटात आणि लॉकडाऊनच्या काळातही जीवमुठीत घेऊन हमाल पोटाच्या खळगीसाठी राबतायत हमाल. त्यांचे जीवन म्हणजे कायम कष्ट.जीवनावश्यक अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी मुरूम येथील महाराष्ट्र शासकीय धान्य गोदामात गेल्या अनेक वर्षापासून येथील हमाल काभाटकष्ट करतात.कष्ट हे त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे.

जिल्हा पुरवठा विभागाकडून वेळी-अवेळी माल वाहतूक गाडी आली की,त्यांना कशाचेही कारण न सांगता गोदाम गाठावे लागते.घरी सणसुद असो वा पाहुणे आलेले असो अथवा आजारपण हे कुठलेही सबब सांगता येत नाही.उन्ह,वारा,पाऊस डोक्यावर घेऊन कशाचीही तम्मा न बाळगता कष्ट करावेच लागते.जेव्हा गाडीने माल गोदामात येतो तेव्हाच काम मिळते. हे अंगमेहनतीचे काम असल्याने शरीराकडे देखील दुर्लक्ष करता येत नाही.शरीर धष्टपुष्ट असेल तरच हे ओझ्याचे काम करता येते.हातावरचे पोट असल्याने घरीही बसताच येत नाही.


या कोरोनाच्या काळात सुध्दा त्यांना तत्परतेने काम करावे लागते.पोटाची खळगी भरण्याकरिता आयुष्यभर कष्टाचा सामना करावा लागतो.चोवीस तास दक्ष राहावे लागते.कधी कुठली गाडी येईल हे सांगता येत नाही.पोटाची खळगी आणि कुटूंबाची जबाबदारी असल्याने हमाली केल्याशिवाय पोट भरणे अशक्य आहे.सहा चाकी मोठ्या(ट्रक) गाडीत ४०० नग पोते म्हणजे २०० क्विंटल माल खाली करण्यासाठी दहा ते अकरा जण मिळून पाच ते सहा तासाचा कालावधी मोजावा लागतो.या हमालांना एका पोत्यामागे ३७ रुपये मिळतात.या पोटी त्यांना गाडीतील पोते खाली घेणे,ते सोडणे,त्याचे वजन काट्यावर ५० किलोप्रमाणे कट्टे तयार करुन शिवणे,ते पोते थप्पीला लावणे त्यानंतर जिथे माल पाटवावयाचा आहे त्या गाडीत भरणे या सर्व प्रक्रियेनंतर त्यांना एका पोत्यामागे ३७ रुपये मिळतात.असे २०० नग पोते अकरा हमालामध्ये त्याची विभागणी केल्यास ७४०० रुपये होतात. त्याची प्रत्येकी विभागणी केल्यास ७७३ रुपये हमाली मिळते.ऐवढे सर्व करुनही हमाली पुरवठा कार्यालयाकडून वेळेवर पैसे मिळतील याची गॅरेटी नाही.कधी-कधी तर उशीरा हमाली मिळते.अशा वेळी कोणाकडून तरी उसनवारी करून उपजीवीका भागवावी लागते.या गाडीमध्ये २०० क्विंटल माल म्हणजे कमी-अधिक भरलेले ४०० नग पोते असतात.कष्ट हेच भांडवल या म्हणीप्रमाणे त्यांचे जीवन असल्याच्या भावना या हमालांनी बोलून दाखविल्या.या हमालांना केव्हा वाढीव हमाली मिळेल हे आजतरी सांगता येणार नाही.   

             हे शासकीय गोदाम ५००० हजार क्विंटलचे आहे.यामध्ये गहू,तांदूळ व साखर मालाची आवक-जावक होते.इथे जिल्हा पुरवठा विभागाकडून माल पुरवठा केला जातो.या गोदामा अंतर्गत या परिसरातील ४७ गावांना माल वितरीत केला जातो.अजमीरा वाहतूक प्रतिनिधी मनोज कोळीसह मुकदम गुलाब क्षीरसागर,महादेव क्षीरसागर,नागनाथ क्षीरसागर,दत्ता देडे,दिपक देडे,शेषेराव ऐडके, जालिंदर देडे हे सर्व मुरूमचे तर साईनाथ वासुदेव,मनोज वासुदेव,श्रीकृष्ण भोसले व हसनाप्पा वासुदेव हे सर्व बेरडवाडीचे हमाल  असल्याचे शासकीय गोदामपाल बलभीम घोडके यांनी माहिती दिली.       

प्रतिक्रिया :

 : मी गेल्या २५ वर्षापासून मुकदम म्हणून इथे काम करतो.पोटाची खळगी  व कुटूंबाची जबाबदारी कर्ता व्यक्ति म्हणून पार पाडावी लागत आहे. आज माझे ५५ वय असतानाही कमी  रक्कमेवर हे कष्टाचे काम उपजीविकेचे दुसरे साधन नसल्यामुळे याशिवाय पर्याय नाही.सध्याच्या काळात या हमालीवर कुंटूब चालवणे अवघड झाले आहे. आमच्याकडे कोणाचेही लक्ष नाही.मी डॉ.बाबा आढाव हमाली मापाडी संघटनेचा सदस्य आहे.       

-   गुलाब निवृत्ती क्षीरसागर,मुकादम,मुरूम                          ...........................   

 मी दररोज गावाकडून ५ किलोमीटर पायी ये जा करतो.घरची परिस्थिती हालाखीची असल्याने मला हमाली केल्याशिवाय गत्यंतर नाही.अशिक्षीत असल्याने हमाली केल्याशिवाय जीवन जगणे कठीण आहे. अंगमेहनतीचे व कष्टाचे काम असल्याने मानपाट दुखते.पण सांगणार कोणाला.आजारी पडल्यास कुटूंबाचे कसे होईल ही चिंता सतावते.या लहान सहान गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढे हमाली काम करावेच लागते.कोरोनाच्या काळात तर आम्ही जीवमुठीत घेऊन सर्व हमाल काम करीत आहोत.आमच्याकडे मायबाप सरकारने लक्ष देवून आमच्या हमालीचे दर वाढवून आमची अडचण सोडवावी अशी भावना त्यांनी व्यक्त केली.                 - श्रीकृष्ण भोसले,हमाल,बेरडवाडी
 
Top