उस्मानाबाद दि. १९ : लोहारा तालुका कृषी विभागाद्वारे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीमूळे खते, बियाणे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पुरवठा करण्याच्या योजनेचा शुभारंभ दि. १९ मे रोजी जेवळी (दक्षिण) येथून आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला.
लोहारा तालुक्यातील शेतकरी व महिला बचत गटाच्या माध्यमातून जवळपास २७ हजार शेतकऱ्यांना सुमारे ४५०० मेट्रिक टन खत व ६५०० क्विंटल बियाणे एवढी कृषी निविष्ठांचा शेतकऱ्यांच्या बांधावर थेट पुरवठा करण्याचे लोहारा कृषी विभागाद्वारे उद्धिष्ट ठेवण्यात आले आहे.यानुसार आज जेवळी (दक्षिण)येथील उमेद अंतर्गत स्फूर्ती महिला ग्रामसंघाद्वारे ५५ मेट्रिक टन खते वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.
याच ठिकानी आ.ज्ञानराज चौगुले यांच्या उपस्थितीत उपस्थित महिलांना शेतकऱ्याच्या घरातील सोयाबीन बियाणांची उगवण क्षमता तपासणीचे प्रात्यक्षिकही करून दाखवण्यात आले. तर प्रत्येक गावातील महिला बचत गटांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांना साखळी पद्धतीने प्रशिक्षित करण्याच्या सूचना देण्यात आल्या .तसेच रासायनिक आणि जैविक बीज प्रक्रिया करूनच रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी करण्याचे आवाहन आ. ज्ञानराज चौगुले यांनी केले.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बजरंग मंगरुळकर , कृषी उपसंचालक अभिमन्यू काशिद, तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग, गटविकास अधिकारी काळे ,शिवसेना तालुका प्रमुख मोहन पनुरे ,जिल्हा कृषी नियंत्रण निरीक्षक चेतन जाधव, कृषी पर्यवेक्षक शिंदे एस टी, मंडळ कृषी अधिकारी माळी जे डी, कृषी सहाय्यक जी. एम. बिराजदार , उमेदचे तालुका समन्वयक नरेंद्र गवळी ,प्रभाग समन्वयक शिवाजी कांबळे ,दक्षिण जेवळीचे सरपंच चंद्रकांत साखरे,शिवराज चिनमुंडे ,स्फूर्ती बचत गटाच्या अध्यक्षा मनीषा कारभारी ,ग्रामपंचायत सदस्य सुरेश दंडगुले, नागनाथ बिराजदार आदी उपस्थित होते.
