ताज्या घडामोडी


आजच्या घडीचा एक vesatile ऍक्टर सुशांत सिंग राजपुतच्या बातमी ऐकून मन सुन्न झाले. आत्महत्या की हत्या हे कदाचित नंतर पुढे येईल. पण आत्महत्येचा कारण काय वगैरे बरीच चर्चा आज होत आहे. खरतर आज जग सोडून जाणारी आत्महत्या करणारी व्यक्ती बदलली असली तरी कारण तीच आहेत, चर्चा तीच आहे गैरसमज तेच आहेत. आज सेलिब्रिटी ने आत्महत्या केली म्हणून चर्चा होत असली तरी रोज अनेक लोक आत्महत्या करून आपलं जीवन संपावतायत. आपण मात्र हळहळ व्यक्त करण्याशिवाय किंवा काहीजण लेबल लावण्याशिवाय काही करत नाही. दोन दिवस चर्चा होईल परत तीच परिस्थिती. हे खरंच समजून घ्यायच असल्यास तीन वर्षांपूर्वी लिहलेला , सर्वानीच वाचावा व विचार करावा असा लेख.



आत्महत्या

आत्महत्या ही एका दिवसात किंवा एका क्षणात होणारी गोष्ट नाही. आपल्या आजूबाजूला अनेक वेळा काही लोक आत्महत्येची तयारी करत असतात. ते रोज एक एक पाऊल आत्महत्येच्या दिशेने टाकत असतात. अनेकवेळा ते आत्महत्या करण्याबाबतचे सुप्त संकेत देत असतात बऱ्याच वेळी ती मदतीची हाकही असते. परंतु आपण आपल्या स्व:त मध्ये एवढे गुरफटलेले असतो कि आपल्या ते लक्षातच येत नाही किंवा बऱ्याच वेळा आपण सर्व ठीक होईल ! काळजी करू नको ! सगळ्यांच्याच आयुष्यात प्रोब्लेम येतात इत्यादी रटाळ वाक्य त्या व्यक्तीला ऐकून दाखवतो. आणि ज्या वेळी ती व्यक्ती आत्महत्या करते त्यावेळी मात्र आपणास जाग येते आणि आपण मग म्हणतो ती व्यक्ती आत्महत्या करेल असे वाटले नव्हते ? 
ओळखता येते का आपल्याला हे ? कस ओळखता येईल हे ? कशा थांबवता येऊ शकतात आत्महत्या ?


 काल एका हुशार, जिद्दी व होतकरू ऍक्टर ने आत्महत्या केली काही वर्षा पूर्वी तडफदार पोलीस अधिकारी आध्यात्मिक गुरुची आत्महत्या ! एवढा हुशार व यशस्वी ऍक्टर होता तरी त्याने आत्महत्या केली, एवढे तडफदार पोलीस अधिकारी होते परंतु त्यांनी कॅन्सरच्या  आजाराला कंटाळून आत्महत्या केली, आध्यात्मिक गुरु होते तरी त्यांनी कुटुंबीय कारणातून आत्महत्या केली. एवढे शरीराने किंवा मनाने कणखर असणाऱ्या व्यक्तींनी का बर आत्महत्या केली असावी ?

तुमच्या प्रश्नातच तुमचे उत्तर आहे. कारण त्या व्यक्ती आहेत , सर्वप्रथम ते माणूस आहेत. तडफदार पोलीस अधिकारी असले तरी ते आधी माणूस आहेत. आध्यात्मिक गुरु, महाराज असले तरी आधी ते माणूस आहेत. त्यांच्या कामाने आणि कर्तुत्वाने ते मोठे माणूस किंवा देवमाणूस झाले तरी आधी ते माणूसच आहेत. त्यामुळे शरीराचा जो नियम इतरांना लागू होणार तोच त्यांनाही होणार. जस इतरांचं शरीर आहे तसच त्यांचही, जस त्यांना इन्सुलिन कमी होऊन डायबेटीस  होऊ शकतो. तसेच मेंदूमधील सेरोटोनिन रसायन कमी होवून नैराश्य / Depression  हा आजार होणारच. सामाजिक , आर्थिक , कौटुंबिक कारणापेक्षाही जास्त याकडे मानसिक आजार म्हणून पाहणे गरजेचे आहे. कौटुंबिक कारण याचा उल्लेख सर्वत्र झाला परंतु त्यांनी नैराश्याच्या आजारातून किंवा डिप्रेशन मुळे आत्महत्या केली असं कोणीही म्हणत नाहीये. *डिप्रेशन किंवा नैराश्य कोणालाही येऊ शकत.*


*म्हणजे मनाने कणखर असणाऱ्या व्यक्तींना पण नैराश्य येऊ शकत काय ?*

होय मनाने कणखर असणाऱ्या व्यक्ती सुद्धा नैराश्याने ग्रस्त होऊ शकतात. कारण नैराश्य हे फक्त बाहेरच्या कारणाने किंवा मानसिक कारणानेच येते असे नाही. यासाठी जैविक कारण हि असते ते अनुवांशिकही असू शकते. जसा फक्त गोड खाणाऱ्यालाही Diabetes होऊ शकतो तसे इतर कारण नसतानाही नैराश्याचा आजार होऊ शकतो. नक्कीच कणखर मन असल्यास नैराश्य होण्याची शक्यता कमी शकते ,परंतु नैराश्याचा आजार होणारच नाही असे नाही. किंबहुना आपल्याकडील कणखर मनाची व्याख्याही खूप चुकीची आहे. जो सर्वपणे निमुटपणे सहन करतो तो कणखर, जो कधीही रडत नाही तो कणखर असे आपल्या समाजात गैरसमज आहेत. यामुळेच प्रॉब्लेम होतो. कितीही वाईट वाटले तरी सहन करायचे आणि मनातल्या मनात कुढत राहायचे. त्यामुळे मग याने मनावरचा तणाव वाढत जातोच आणि मग त्याचा परिणाम शरीरावर मेंदूवर झाल्याने मेंदूतील सेरोटोनिन रसायन कमी होते व त्यांना नैराश्याचा आजार होतो. राग, द्वेष, दु:ख या सर्व नॉर्मल भावना आहेत. वेळोवेळी त्या वाटत नी व्यक्त होणे गरजेचे असते. खर म्हणजे मनाने कणखर म्हणजे फक्त सहन करणे नव्हे तर योग्य वेळी योग्य प्रकारे आपल्या भावना व्यक्त करणे होय. या भावना, दु:ख जर योग्य प्रकारे बाहेर पडली त्याचा व्यवस्थित निचरा झाला तर आणि आपण त्या अर्थाने मन कणखर केले तर आत्महत्येचे प्रमाण नक्की कमी होऊ शकते. 

*म्हणजे आर्थिक कारण वैयक्तिक समस्या, कौटुंबिक असमाधान, कॅन्सर सारखा आजार यामुळे व्यक्ती आत्महत्या करत नाही का ?*
नाही असे नक्कीच नाही. कारण हि फक्त वरची कारणे हि आत्महत्येसाठी कारणीभूत नाहीत. तसे असते तर अशी समस्या असणाऱ्या सर्व व्यक्तींनी आत्महत्या केली असती. ज्यावेळी आर्थिक कारणे वैयक्तिक समस्या किंवा दुर्धर किंवा शेवटच्या टप्यातील आजार ज्यावेळी जास्त दिवस राहतात त्यावेळी व्यक्तीचा वैयक्तिक मानसिकता, तणावाचे नियंत्रण करण्याची पद्धत यानुसार शरीरावरती परिणाम होत असतो. त्यामुळे शरीरातील कोर्टीसोल व मेंदूतील सेरोटोनीन रासायनावरती परिणाम होत असतो. ज्यावेळी हे सिरोटोनिन रसायन एका ठराविक प्रमाणाच्या खाली जाते त्यावेळी त्यास नैराश्याचा आजार होतो. नैराश्याचा उपचार न भेटल्यास व ते वाढत गेल्यास व्यक्ती आत्महत्या करते.

*नैराश्याचा आजार म्हणजे नेमके काय ? हा खरच आजार आहे का ?*
नैराश्य आणि नैराश्यचा आजार यामध्ये थोडासा फरक आहे तो समजून घेण खूप महत्वाच आहे. अपेक्षाभंग होतो, आपल्या मनाविरुद्ध काही होते, काही समस्या येते त्यावेळी आपल्याला निराशा वाटण साहजिक आहे हि नॉर्मल भावना आहे परंतु ते थोडा काळ टिकत आणि नंतर आपल्याला बर वाटत. चांगल काही झाल तर आनंद होतो. त्याचा आपल्या वैयक्तिक जीवनावरती, कौटुंबिक जीवनावरती, व्यावसायिक जीवनावरती व नातेसंबंधावरती किंवा झोप, भूक या गोष्टीवर परिणाम होत नाही किंवा झाला तरी तो फक्त थोड्या काळापुरता असतो. परंतु ज्यावेळी हा निराशपणा कमी होत नसेल. व्यक्तीस सतत उदास, निराश वाटत असेल, काही करावेसे वाटत नसेल, काही केल्यास आनंद वाटत नसेल आणि या सर्व गोष्टींचा त्याच्या वैयक्तिक, कौटुंबिक , व्यावसायिक जीवनावर परिणाम होत असेल आणि तो २ आठवड्यांपेक्षा जास्त काळटिकत असेल तरच त्यास नैराश्याचा आजार असे म्हणतात.

*मग या नैराश्याचा आजाराची लक्षणे काय असतात ? तो कसा ओळखायचा?*
मी जस म्हंटल कि जर सतत मनात निराश किंवा उदास वाटत असेल आणि त्यासोबत भूक किंवा झोप लागत नसेल, दैनंदिन काम किंवा आवडत्या गोष्टी करण्याची इच्छा होत नसेल, लक्ष लागत नसेल, कोणाशीही बोलण्याची इच्छा होत नसेल, एकट राहवस वाटत असेल, सतत रडायला येत असेल तर ते नैराश्य असू शकत. काही वेळा व्यक्तीला स्व:ताला उदास वाटत नसले तरी त्याचा सततचा चिडचिडेपणानैराश्याचे लक्षण असू शकते. ज्यावेळी हे नैराश्य टोकाला जाते त्यावेळी मात्र रुग्णास आपली काहीही किंमत नाही, आपण काहीही करू शकत नाही. आपल्याला कोणीही मदत करू शकत नाही आणि आपल्याला कोणीही यातून बाहेर काढू शकत नाही वाटत आणि पुढे आयुष्यात काहीही चांगल होऊ शकत नाही वाटत त्यावेळी मात्र मग जगायचं कशाला असे विचार येतात व मग मात्र या तीव्र नैराश्याच्या रुग्णाला आत्महत्येचा विचार यायला लागतात व रुग्ण आत्महत्येचा प्रयत्न करू शकतो .

*मग हा आजार असेल तर त्यावरती उपचार पण असतील ना? आत्महत्या थांबवण्यासाठी पण उपचार आहेत का ? असतील तर ते कुठले ?*
होय, सध्या नैराश्यावरती खूप चांगले औषधोपचार उपलब्ध आहेत. नवीन नवीन शोध लागून खूप चांगल्या प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. औषधोपचारासोबत मानसोपचारही उपलब्ध आहेत. सौम्य नैराश्याच्या आजारामध्ये फक्त मानसोपचारानेही रुग्ण बरा होऊ शकतो पण मध्यम व तीव्र स्वरूपाच्या आजारामध्ये मात्र औषधोपचाराची गरज असते. कधी कधी तीव्र स्वरूपाच्या नैराश्यात जसे कि आत्महत्येचा विचार येत असल्याय मात्र इलेक्ट्रोकन्वल्सीव थेरपी म्हणजे शॉक या पद्धतीचा उपचार केला जातो. शॉक ही अत्यंत चांगली व रामबाण उपचार पद्धती असून सुरक्षिततही आहे परंतु लोकांमध्ये याबद्दल खूप गैरसमज आहेत. नक्कीच आत्महत्या थांबवण्यासाठीही उपचार आहेत परंतु ते उपचार आत्महत्येच्या कारणानुसार बदलतात.

*म्हणजे नैराश्याचा आजार सोडून इतर काही आजर आहेत का की ज्यामध्ये व्यक्ती आत्महत्या करते ?*
होय आत्महत्या हे फक्त लक्षण आहे. त्याची अनेक कारणे असतात. ९० – ९५ %आत्महत्येच्या मागे काही ना काही मानसिक आजार असतात. त्यापैकी फक्त नैराश्याचा आजार (ज्याला लोक आजार न म्हणता तणावामुळे अस समजतात) हाच आजार काही लोकानां माहित आहे. स्किझोफ्रेनिया, द्विधृवीय अवस्था , दारू व अंमली  पदार्थांचे व्यसन व त्याच्या अमलाखाली व त्यामुळे होणारे मानसिक आजार , व्यक्तिमत्वाचे दोष व आजार , प्रसूतीपश्चात होणारे मानसिक आजार व इतर मानसिक आजारांच्यामुळे व्यक्ती आत्महत्या करू शकते. त्यामुळे ते कारण शोधणे खूप महत्वाचे असते. वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, भावना व विचारांमध्ये विचित्रपणा किंवा बदल दिसून आल्यास लगेच मानोसोपचार तज्ञांना दाखवून उपचार करणे गरजचे असते. असे आजार वाढत गेल्यास बऱ्याचवेळी त्याचा शेवट आत्म्हत्येनेच होतो.

*जर एवढ्या आत्महत्या आपण थांबवू शकतो ? एवढे चांगले औषधोपचार उपलब्ध आहेत. तरी मग आत्म्हत्येच प्रमाण का वाढत चालेल आहे ?*
कारण समाजाची मानसिकता बदलत नाहीये. मुळातच मानसिक आजार म्हंटले कि लोकांच्या नजरा बदलतात. मानसिक आजाराबाबत कलंकित दृष्टी आहेत. एखाद्याची छाती दुखत असेल तर Heart Attack असे म्हणून किंवा B.P ,Diabetes इत्यादींच्या उपचारासाठी लोक लगेच जातात, त्यासोबत २-४ नातेवाईकही असतात. परंतु मानसिक आजार किंवा मनाचे आजार त्रास होत असूनही लोक मनोविकारतज्ज्ञ कडे जात नाहीत. लोक काय म्हणतील ही भीती त्यांच्या किंवा नातेवाईकांच्या मनात असते. किती तरी वेळा Depression  च्या पेशंटच्या नातेवाईकाला सोबत यायला सांगूनही नातेवाईक येत नाहीत. मुळातच शरीरासारखे मनालाही आजार होतात हेच बऱ्याच जणांना व समाजाला पटत नाही. जी गोष्ट उपचारांबाबत तीच प्रतिबंधात्मक उपायांबाबत शारिरीक आजार होऊ नये म्हणून व्यायाम करणारे, काळजी घेणारे बरेच आहेत. मनाचे आजार होऊ नये म्हणून आपण काय करतो. ज्यावेळी हे सर्व समाजाला कळेल, समाजाचा मानसिक आजाराकडे व रुग्णाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल, कलंक मिटेल. मानसिक आजाराची लक्षणे व्यक्तीला, नातेवाईकाला ओळखता येतील व योग्य वेळी उपचार भेटेल तर त्यावेळी हे चित्र नक्कीच बदलेल . 

*मग एखादा व्यक्ती आत्महत्या करू शकते हे नातेवाईकाला, मित्रांना कसे ओळखता येऊ शकते ?*
विचार वागणे ,बोलणे यातील अचानक होणारा बदल नातेवाईकाना ओळखता येण खूप गरजचे आहे. जर व्यक्ती सतत निराश राहत असेल , रडत असेल , एकटा राहत असेल तर हे नैराश्याचे तीव्र लक्षण असू शकते. आत्महत्येचे किंवा मरणाचे विचार, मी जन्मलोच नसतो तर मी मेलो असतो तर, कशासाठी जगायचं, जर पुढच्या जन्मी भेटलो तर अशा वाक्यांना सिर्यसली घ्यायला हवे. बऱ्याच वेळी परत भेटणार नसल्यासारखे व्यक्ती निरोप घेत असल्यासारखे बोलते. अचानक आपल्या महत्वाच्या वस्तू, धन,  प्रॉपर्टी वाटून द्यायला लागते. आपले मृत्यूपत्र बनवते. कुठल्याही सुसाईड नोटला सिरिअसली घ्यायला हवे. काहीवेळा तणाव असताना प्रॉब्लेम मिटत नाही न होताही व्यक्ती अचानक शांत होते. त्यावेळी त्यांनी आत्महत्या करून सुटणार असे ठरवलेले असू शकते. वरील लक्षणे किंवा स्वतः विषयी , आजुबाजुच्या लोकांविषयी व भविष्याविषयी तीव्र नकारात्मक  विचार असतील किंवा चाकू, दोरी , झोपेच्या गोळ्या , बंदूक , विष इ. गोष्टी व्यक्ती बाळगत असतील तर वेळीच मनोविकारतज्ज्ञना दाखवून घ्यायला हवे व योग्य ती काळजी घ्यायला हवी. 

*एखाद्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील तर त्याने काय करायला हवे ?*
सर्वप्रथम त्या व्यक्तीने स्व:ताला स्व:तला नुकसान करणार नाही, आत्महत्या करणार नाही हे स्व:तला ठामपणे सांगायला हवे. त्यानंतर आपल्या मनातील विचार भावना आपल्या जवळच्या व्यक्तीला / मित्राला सांगून त्याची मदत घ्यायला हवी.  नेहमी आपल्या नातेवाईकांच्या सोबत राहावे एकटे राहू नये. आत्महत्येची कुठली साधने स्वता:बरोबर किंवा घरी बाळगू नयेत. लवकरात लवकर मनोविकारतज्ज्ञ ची भेट घ्यावी व योग्य ते उपचार करून घ्यावेत. वेळप्रसंगी विविध हेल्पलाईन उपलब्ध आहेत त्यांना फोन करावा व मदत घ्यावी.

*मग जो तुम्ही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून उल्लेख केला त्यांमध्ये नैराश्यासाठी किंवा मानसिक आजार होऊनयेत म्हणून काय करायला हवे ?*
त्यासाठी ज्याप्रकारे आपण शरीराचे व्यायाम करायला हवे व काळजी घ्यायला हवी. थोडस अवघड आहे पण रोज करायला हवे. नेहमी सकारात्मक आनंदी दृष्टीकोन ठेवावा. भौतिक सुखाच्या मागे धावण्यापेक्षा ऐहिक सुखाचा विचार करावा. 
द्वेष,मत्सर, हेवा या गोष्टीवरती कंट्रोल ठेवावा. स्ट्रेस मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट इत्यादी गोष्टी शिकून घ्याव्या. आपले सोशल सर्कल वाढवावे. आपण ज्यांच्याशी बोलू शकू असे मित्र जमवावेत. समस्येला ना  घाबरता तो मिटवता  कसे करता येईल किंवा मिटवता येत नसेल तर त्याला तोंड कसे देता येईल हे शिकून घ्यायला हवे. एवढे केले तर नक्कीच त्याची मदत आपले मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी होईल. 

लेखाच्या शेवटी स्वर्गीय दत्त हलसगीकर यांची छान चारोळी सांगू इच्छितो. जी आपल्याला विचार करायला नक्कीच मदत करेल.
*जगण्यावरती प्रेम कर, जग फार सुंदर आहे;*
*अवसेच्या काळोखातही, नक्षत्राचा झुंबर आहे.*
 … आपण  सर्वाना  चांगल्या  मानसिक  आरोग्यासाठी  हार्दिक  शुभेच्छा...!! 

- डॉ अतुल ढगे,
 मेंदू-मनोविकारतज्ञ, लैंगिक समस्यातज्ञ, व्यसनमुक्ती तज्ञ व सर्टिफाईड सायकोथेरपीस्ट व कौन्सेलर. माईंड केअर हॉस्पिटल, रत्नागिरी.
 
Top