पुस्तकांची अमूल्य शक्ती ओळखा
(जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन विशेष २३ एप्रिल, २०२६)
लेखक- लेखक - डॉ. प्रीतम भी. गेडाम
१९९५ पासून, युनेस्को दरवर्षी २३ एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन साजरा करत असून, १०० हून अधिक देशांमध्ये वाचन, प्रकाशन आणि कॉपीराइटला प्रोत्साहन देत आहे. हा विशेष दिवस आपल्याला पुस्तकांच्या अधिक जवळ जाण्यासाठी आणि आपल्या जीवनात त्यांचे महत्त्व अंगीकारण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरणा देतो. या वर्षी २०२६ च्या जागतिक पुस्तक दिनाची संकल्पना “आवडीनुसार वाचन करा” ही असून, वाचनाच्या छंदाला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. या शैलीतून हे दिसून येते की, तुम्हाला ज्या प्रकारच्या साहित्यात रस असेल, ते वाचा आणि वाचनाची सवय लावा. पुस्तके ही जीवनाचे प्रतिबिंब असतात, पुस्तके आपल्याला सत्य आणि नीतिमत्तेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात. पुस्तके ही जीवनाचे प्रतिबिंब असतात, पुस्तके आपल्याला सत्य आणि नीतिमत्तेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात. जगभरातील महान व्यक्ती त्यांच्या विशेष कामगिरीमुळे प्रसिद्ध झालेत.
पैसा, प्रसिद्धी, नाव, काम आणि व्यस्तता असूनही आणि दर मिनिटाला लाखो रुपये कमावत असूनही, उद्योगपती, खेळाडू, राजकारणी आणि चित्रपट नायकसुद्धा दररोज पुस्तकं वाचण्यासाठी आपल्या मौल्यवान वेळेतील काही क्षण काढतात.
आर्थिक अडचणी असताना, एक वेळचे जेवण टाळून आणि त्यातून पैसे वाचवून पुस्तके विकत घेण्याचा प्रयत्न आपण कधी केला आहे का? जगात ज्ञानाचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कठीण काळात पुस्तके विकत घेण्यासाठी एक वेळचे जेवणही सोडले होते. जेणेकरून आपण ज्ञानाचे मूर्तिमंत स्वरूप असलेल्या पुस्तकांचे तेज आत्मसात करू शकू. हीच पुस्तकांबद्दलची तळमळ, आवड आणि त्यांच्या महत्त्वाचे आकलन होय. बहुतेक मोठ्यालोकांकडे, त्यांच्या घरी पुस्तकांचा संग्रह असतो, पुस्तकें वाचायला, जपायला आवडतात, म्हणजेच एक वैयक्तिक ग्रंथालय. जगात पुस्तकांपेक्षा उत्तम सोबती नाही. पुस्तके आपल्याला नेहमी योग्य दिशेने मार्गदर्शन करतात. पुस्तके आपला फावला वेळ देखिल ज्ञानाने भरून टाकतात. पुस्तके बुद्धीला तीक्ष्ण, जागरूक आणि विवेकी बनवून आपण सत्य आणि असत्य यांतील फरक ओळखायला शिकतो. पुस्तके आणि शिक्षणाच्या माध्यमातून आपण जगभरातील प्रत्येक क्षेत्रात सर्वोच्च स्थान प्राप्त करू शकतो.
जागतिक पुस्तक दिन हा वाचन, पुस्तके, प्रकाशन, लेखकांचा गौरव आणि कॉपीराइट जागृतीला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो. आजही आधुनिक जीवनात पुस्तकांचे महत्त्व अतुलनीय आहे. पुस्तके शिकवतात, प्रेरणा देतात, मनोरंजन करतात आणि आपल्याला वेगवेगळ्या भाषा, संस्कृती व पिढ्या मध्ये जोडतात. जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिनाची मुख्य उद्दिष्ट्ये सर्व वयोगटातील लोकांसाठी पुस्तके अधिक सुलभ करणे, वाचनाच्या सवयीला प्रोत्साहन देणे, प्रकाशन आणि साहित्यिक संस्कृतीला चालना देणे, बौद्धिक संपदेबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि समाजातील प्रत्येक वाचकाला पुस्तके सहज उपलब्ध होतील याची खात्री करणे हे आहेत. पुस्तके कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता विकसित करतात, भाषा आणि संवाद कौशल्ये सुधारतात, संस्कृती आणि इतिहासाचे जतन करून विविध पिढ्यांमधील वाचकांना जोडतात, आणि शिक्षण घेण्यास व आजीवन शिकण्यास प्रोत्साहन देतात. नियमित वाचनामुळे शब्दसंग्रह, एकाग्रता, आत्मविश्वास आणि विचारशक्ती सुधारतात.
आजचा 'जागतिक पुस्तक दिन' हा पुस्तकांचा आनंद आणि सामर्थ्य साजरे करण्याची एक उत्तम संधी आहे. एखादे नवीन आवडते पुस्तक वाचून, ग्रंथालयांना भेट देऊन, मित्र, नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्तींसोबत पुस्तकांची देवाणघेवाण करून किंवा इतरांमध्ये वाचनाची आवड निर्माण करून हा दिवस साजरा केला पाहिजे. आपल्याला आवडत्या पुस्तकांवर इतरांशी किंवा मित्रांशी चर्चा करावी, आपल्याला ते पुस्तक का आवडते आणि इतर वाचकांनी ते का वाचले पाहिजे, हे स्पष्ट करावे, जेणेकरून इतर लोकांनाही प्रेरणा मिळेल आणि ते पुस्तक वाचण्याची उत्सुकता निर्माण होईल. चांगल्या पुस्तकांना नेहमी प्रोत्साहन दिले पाहिजे, जेणेकरून दर्जेदार पुस्तके वाचकांपर्यंत सहज पोहोचू शकतील. जो व्यक्ती पुस्तकांशी मैत्री करतो, त्याला यशाच्या मार्गावर जाण्यापासून कोणीही कधीही रोखू शकत नाही, कारण समस्येचे समाधान पुस्तकांमध्येच दडलेले असते. पुस्तके कधीही तक्रार करत नाहीत; ती केवळ ज्ञानाची नदी वाहत ठेवतात. ज्यांनी त्यांना स्वीकारले ते समृद्ध झाले, तर ज्यांनी त्यांचे महत्त्व दुर्लक्षित केले ते मागे पडले.
आजच्या इंटरनेटच्या युगात पुस्तकांचे स्वरूप डिजिटल झाले आहे, पुस्तके आपल्याला फक्त एका क्लिकवर सहज उपलब्ध होतात, म्हणजेच पुस्तके सहज उपलब्ध असूनही आज वाचनसंस्कृती कमकुवत होत असल्याचे दिसते. तरुण पिढी सोशल मीडियाच्या विळख्यात अडकत आहे, अभ्यासाच्या नावाखाली ते पुस्तकांऐवजी शॉर्टकट नोट्सवर अवलंबून राहणे पसंत करतात. परंतु या शॉर्टकट नोट्स विद्यार्थ्यांना केवळ काही प्रश्नांची मर्यादित उत्तरे देतात आणि त्यांना फक्त नाममात्र पदवी मिळविण्यात मदत करतात. पण जेव्हा एखाद्या विषयाच्या सखोल ज्ञानाचा किंवा जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर त्या ज्ञानाच्या महत्त्वाचा प्रश्न येतो, तेव्हा हेच विद्यार्थी अपयशी ठरतात, कारण या तरुणांनी गहन ज्ञान असलेल्या पुस्तकांचे महत्त्व कधीच समजून घेतलेले नाही किंवा वाचलेले नाही. अशा वातावरणात, जेव्हा जीवनातील परिस्थिती अस्थिर किंवा कठीण होते, तेव्हा माणूस समस्या सहजपणे सोडवण्याऐवजी डगमगतो आणि त्यापासून पळून जातो किंवा पळवाटा शोधतो. त्यामुळे नैराश्य, आत्महत्या, गुन्हेगारी आणि अमली पदार्थांचे व्यसन यांसारख्या समस्या झपाट्याने निर्माण होतात आणि जीवनात अडचणींचा डोंगर उभा राहतो. पुस्तके प्रत्येक अडचणीत आपल्या पाठीशी उभी राहतात, जे त्यांना ओळखतात ते पुन्हा कोणत्याही समस्येत अडकत नाहीत, कारण त्यांना परिस्थितीला कसे सामोरे जायचे हे माहित असते आणि यश त्यांच्या जवळ येत. सर्वप्रथम, पुस्तके वाचण्याची सवय लावा, वेळेचा सदुपयोग करा, ज्ञानी बना व जागरूक व्हा आणि आयुष्यभर पुस्तकांशी मैत्री टिकवून ठेवा, म्हणजे पुस्तके नेहमी आपल्यासोबत राहतील. आनंदी, समाधानी आणि यशस्वी आयुष्य जगण्याची ही खूप सोपी पद्धत आहे.
लेखक - डॉ. प्रीतम भी. गेडाम
prit00786@gmail.com