उस्मानाबाद -  भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची 31 ऑक्टोबर रोजी साजरी होणारी जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून पाळण्यात येणार आहे. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी रन फॉर युनिटीचे आयोजन केले आहे.  येथील जिल्हाधिकारी कार्यालयापासून सर्वधर्मीय प्रार्थनेने यास सुरुवात होणार आहे. सर्वसामान्य नागरिकांपासून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग यात राहणार असून नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवावा आणि राष्ट्रीय एकात्मतेप्रती असणारी बाधीलकी अधिक दृढ करावी, असे  आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी उस्मानाबादकरांना केले आहे. विशेष म्हणजे, रन फॉर युनिटीनंतर सहभागी झालेले सर्वजण सामुदायिक स्वच्छता मोहिम राबविणार आहेत.
    येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आज डॉ. नारनवरे यांनी यासंदर्भातील नियोजनासंदर्भात बैठक घेतली. अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, अपर पोलीस अधीक्षक बाळकृष्ण भांगे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शिल्पा करमरकर, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) शिरीष बनसोडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी शशीमोहन नंदा आदींसह विविध विभागांचे अधिकारी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय मंत्री, रोटरीचे जिल्हाध्यक्ष नितीन तावडे आदींची यावेळी उपस्थिती होती.
    राज्य प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार 31 ऑक्टोबर रोजी या रन फॉर युनिटीचे आयोजन केले जाणार आहे. सकाळी 7 वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालय येथून सुरुवात होणार आहे. त्याच दिवशी दुपारी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या योगदानाबद्दल विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे.  सायंकाळी पोलीस दलाच्या वतीने शहरात संचलन होणार आहे तसेच सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची मानवी साखळी करुन राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला जाणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी सांगितले. सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यात असावा. त्यादृष्टीने समाजाच्या सर्व घटकांनी या रन फॉर युनिटीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
    सर्व घटकांचा यात समावेश असावा, या हेतूने मंगळवारी दुपारी 3 वाजता जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले असून शहरातील विविध उत्सव मंडळे, असोसिएशन्स, सामाजिक संघटना, डॉक्टर्स, वकील, व्यापारी यांच्या संस्थांचे प्रतिनिधी, क्रीडा मंडळे यांची नियोजनसाठी बैठक बोलावण्यात आली आहे. या उपक्रमात सदर संस्था कशाप्रकारे योगदान देऊ शकेल आणि त्यांचा सहभाग नोंदवू शकेल हे यावेळी जाणून घेण्यात येणार आहे. या रन फॉर युनिटीला अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक रुप यावे आणि सर्वांचा सहभाग असावा, हा यामागील उद्देश असल्याचे डॉ. नारनवरे यांनी सांगितले. कला महाविद्यालयांच्या परीक्षा सुरु असल्या तरी अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन, औषधनिर्माण, डी.एड., बी.एड. महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनीही यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
Top