उस्मानाबाद -  व्यवस्थेचा जाचक पगडा मिरविणारा समाज संस्कृतीच्या नावाखाली खोट्या प्रतिष्ठा जपत असतो. त्यातून माणसांचे अवमुल्यन होते, अशा व्यक्ती तटस्थपणे टिपून वाचकांच्या मनात त्याविषयी विचार करण्याची संवेदना जागे करणारे साहित्य चिरकाल टिकते. कथा-व्यथा या कथासंग्रहात ती संवेदना आणि सहवेदना निश्‍चितच आहे. त्यामुळे सामान्य माणसांच्या सामान्य संघर्षाला अक्षरांच्या माध्यमातून एक जिवंतपणा आला असल्याचे प्रतिपादन प्रख्यात साहित्यीक देवीदास फुलारी यांनी केले. 
         
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने येथील ज्येष्ठ लेखिका श्रीमती कमलताई नलावडे यांच्या कथा-व्यथा या कथासंग्रहाचे प्रकाशन फुलारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास पत्रकार दयानंद माने, प्राचार्या डॉ. अनार साळुंके, मसापचे अध्यक्ष नितीन तावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नम्रता ही माणसाला नेहमी पुढे घेऊन जाणारी प्रक्रिया आहे. याचा प्रत्यय नलावडे यांचा कथासंग्रह वाचताना पावलोपावली येतो. यातील काही कथा या कथेच्या प्रारूप संकल्पनेत बसतील आणि काही बसणार नाहीत. मात्र तो एक सृजनात्मक अनुभव आहे. समीक्षक त्याला काहीही म्हणो; परंतु तो अस्सल अनुभव नलावडे यांनी प्रामाणिकपणे मांडला असल्याचेही फुलारी यांनी सांगितले. स्त्रीयांचे चित्रण त्यांच्या कथांमधून अधिक ठळकपणे समोर येते. कित्येक कथांमध्ये दीर्घकथा नव्हे, तर कादंबरीची बीजे आहेत. भविष्यात त्यांच्या हातून नक्की अशा साहित्यकृतीही आपणां सर्वांना अनुभवण्यास मिळतील, असा विश्‍वासही फुलारी यांनी व्यक्त केला. मागील दोन वर्षांत उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या साहित्य चळवळीची गती निश्‍चितच मराठवाड्याचे लक्ष वेधून घेत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्याचा प्रत्यय घुमान येथे अखिल भारतीय मराठी साहित्य सारस्वतांनीही घेतला. उस्मानाबादकरांनी घुमानमध्ये आपल्या उपस्थितीच्या माध्यमातून सर्वांना दखल घेण्यास भाग पाडले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 
अवतीभोवती असलेली सर्वसामान्य माणसे, त्यांचा सभोवताल, दैनंदिन जीवनात दिसणारा आपला परिसर शब्दांच्या माध्यमातून मांडला आहे. अनेक दिवसांपासून हा अक्षर अनुभवांचा साठा पुस्तक रूपाने सर्वांसमोर ठेवण्याची इच्छा होती. आज ती पूर्ण होत आहे. वाट्याला आलेले अनुभव अगदी तळमळीने, प्रामाणिकपणे या कथांच्या माध्यमातून शब्दबध्द केले आहेत. या कथा निश्‍चितच आपणा सर्वांशी संवाद साधतील. आपणही मोकळेपणाने पुस्तकाशी बोला, असे आवाहन लेखिका कमलताई नलावडे यांनी केले. 
प्राचार्य डॉ. अनार साळुंके यांनी या कथासंग्रहामधील बलस्थाने श्रोत्यांसमोर मांडली. एकूण कथात्मक अनुभव व्यक्त करताना लेखिकेच्या व्यक्तीगत जीवनातील अनुभवांची त्यात झालेली बेमालूम सरमिसळ त्यांनी सर्वांसमोर उलगडवून दाखविली. पत्रकार दयानंद माने यांनी विद्यार्थी दशेपासून कमलताई नलावडे यांच्याकडून ऐकलेल्या कथांचे संदर्भ देत हा कथासंग्रह त्याचे मुर्त रूप असल्याचे सांगितले. अनेक पीढ्यांना शिक्षिका म्हणून घडविण्याचे त्यांनी काम केले. या कथासंग्रहाच्या माध्यमातून समाजशिक्षक असलेल्या नलावडे यांच्या दृष्टितून माणसांना स्पष्टपणे वाचण्याची प्रेरणा सर्वांना मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. मसापचे अध्यक्ष नितीन तावडे यांनी मागील चार दशकांपासून कमलताई नलावडे यांनी सामाजिक, साहित्यीक आणि शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाची माहिती सर्वांसमोर मांडली. आज जिवंत असलेली साहित्य चळवळ टिकावी, वाढावी यासाठी त्यांनी घेतलेल्या परिश्रमाची नोंदही तावडे यांनी यावेळी घेतली. भविष्यात मसापच्या वतीने अशा छोट्या-मोठ्या उपक्रमांच्या माध्यमातून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी लागणारे बळ निश्‍चितच मिळेल आणि उस्मानाबादकरांच्या मार्गदर्शनाने, सहकार्याने ते आपण यशस्वीरित्या पार पाडू, असेही त्यांनी सांगितले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. राज कुलकर्णी यांनी, सूत्रसंचालन रविंद्र केसकर तर आभार उमाकांत कुलकर्णी यांनी मानले. यावेळी शिक्षण, साहित्य, राजकारण, सहकार आदी क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


 
Top